बुधवार, २६ जुलै, २०२३

शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व

 http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/10/blog-post.html

शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग १


साधारणपणे २००६-७ मध्ये मी मराठा इतिहास आणि संबंधित विषयांवर ओर्कुटवर लिखाण सुरू केले होते. तेंव्हा मराठीत ब्लॉग वगैरे काही ठावूक नव्हते मला. काही दिवसांनी मला एक सचिन नामक मुलाचा फोन आला. (मी माझा फोन नंबर ओर्कुटवर तेंव्हा ठेवलेला होता.) लोअर परेलला असणाऱ्या एका जुन्या ग्रंथालयात काम करणाऱ्या सचिनने मला त्याच्याकडे असलेली काही जुनी पुस्तके बघण्यासाठी तिकडे बोलावले होते. माझ्या वाचनात उत्तम भर पडेल असे त्याचे म्हणणे होते. मी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच तिकडे पोचलो. त्याने ७-८ पुस्तके माझ्यासमोर काढून ठेवली. मी ती सर्व पुस्तके २ महिन्यात परत करण्याच्या हमीवर घरी घेऊन आलो. त्या ग्रंथालयाचा सदस्य नसताना आणि तो मला ओळखत देखील नसताना त्याने इतकी जुने पुस्तके मला नेऊ देणे म्हणजे मला थोडे आश्चर्य वाटते. अर्थात मी माझा पता आणि संपर्क क्रमांक त्याच्याकडे ठेवलेला होताच. घरी आलो आणि पुढचे काही दिवस सुट्टी असल्याने अधाशासारखे ती पुस्तके वाचून काढू लागलो. त्यातल्या एका पुस्तकाचे नाव होते 'छत्रपती शिवाजी महाराज - पत्ररूप व्यक्तीदर्शन' लेखक होते डॉक्टर रामदास.

ह्या पुस्तकात राजांनी लिहिलेल्या काही पत्रांचा अभ्यास करून राजांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा पर्यंत केलेला होता. सदर पुस्तक १९४२ सालचे होते. माटुंगा येथून प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकाची किंमत अवघे २ रुपये लिहिलेली होती. हे दुर्मिळ पुस्तक आता बाजारात उपलब्ध नाही हे मला ठावूक होते तेंव्हा मी त्या पुस्तकाची सर्व पाने स्कॅन करून घेतली. पुस्तकात शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांची अनुवादित पत्रे होती. अशी एकूण ५० पत्रे छापलेली होती. गेल्या वर्षी मी हा ब्लॉग सुरू केला तेंव्हा त्यातली बहुतेक पत्रे या ब्लॉगवर दिली होती. सदर लिखाण त्याच पत्रांवर आधारीत असून त्यातला भाग १ आपल्यासमोर सादर करतोय... सध्यातरी लिखाण २ भागात संपवायचा विचार आहे पण बघुया जस-जसे लिखाण होईल त्यावर ठरेल किती भाग होतील ते. अपेक्षा हे आपल्याला आवडेल.....




शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे. आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक असे मानसिक बळ ते वेळोवेळी देत असत.


स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) पुढे त्याचाच कुळातील सोनजी गुजर याने राजांना 'पाटीलकी परत करावी, आम्ही स्वराज्यासाठी निष्ठा अर्पण करतो' असे पत्र पाठवले तेंव्हा राजांनी २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार त्याची पाटिलकी मान्य केली आहे. योग्य माणसे ओळखून त्यांच्याकडून निष्ठेने काम करून घेण्याची ही कला अतुलनीय आहे.


शिवरायांनी वतनदारी संस्था बंद करवली असे नेहमी म्हटले जाते, ऐकिवात येते, ते पूर्णपणे खरे नाही. खरेतर त्यांनी वतनदारी संस्थेत अमुलाग्र बदल करून तिचा उपयोग स्वराज्यासाठी केला. ते अधिक मजबूत केले. पुरंदरचे किल्लेदार सरनाईक महादजी यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र निळकंठराव यांना पाठवलेल्या पत्रात राजे म्हणतात,"जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्ताल, तोपर्यंत आम्हीहि तुम्हासी इमाने वर्तोन. तुम्हापासून इमानांत अंतर पडिलियां आमचा हि इमान नाही." कुठले वतन वंश परंपरेने सुरू ठेवायचे आणि कुठले नाही याबाबत ते माणूस ओळखूनच निर्णय घेत असणार. याच आशयाची अजून काही पत्रे उपलब्ध आहेत. 'मी शत्रूंना दगे दिले, मित्रांना दगे दिल्याचे दाखवा' असे आवाहन त्यांनी केले होते. त्याला आजपर्यंत उत्तर आले नाही. स्वराज्य उभे करताना एक-एक माणूस जोडताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती हे जीवाला-जीव देणारी, लाख मोलाची माणसे पाहिली की सहज कळून येते.

शिवरायांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात काही इनामे दिली होती. शिवराय १६७४ मध्ये छत्रपति होण्याआधी विजयनगरचे साम्राज्य हे दक्षिण भारतातले शेवटचे हिन्दू साम्राज्य होते. ते १५ व्या शतकात लयास गेल्यानंतर दक्षिणेमध्ये आदिलशाही, कुतुबशाही यांचे राज्य होते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा वंशज तिरुमलराय यांना शिवरायांनी १५ एप्रिल १६५७ च्या रोप्यपटाद्वारे काही जमीन निर्वाहासाठी इनाम  म्हणून दिली होती. याशिवाय आंबेजोगाईच्या दासोपंतांना, आळंदीच्या 'ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी दर सालाना दानाची व्यवस्था केली होती. आग्र्याहून सुखरूप सुटून राजगडी परत येताना राजांनी ९ वर्षाच्या शंभूराजांना कृष्णाजी विश्वासराव आणि काशी त्रिमल यांच्याकड़े ठेवले होते. ते शंभूराजांना राजगडी परत घेउन आल्यावर राजांनी त्यांना १ लाख रुपये इनाम दिले. १६६० पासून प्रतापगडाच्या तुळजा

भवानी देवीच्या नैवेद्याची संपूर्ण व्यवस्था, १६७५ पासून पाटगाव मौनीबाबांच्या मठाला सालीना १००० माणसांचा शिधा ही सर्व पत्र उपलब्ध आहेत. छत्रपती शिवरायांनी १६७८ मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या चाफळ येथील मठास सनद दिली आहे. त्यात ३३ गावे, ४१९ बिघे जमीन, १ कुरण आणि १२१ खंडी धन्य ह्याचा तपशील दिसून येतो.


छत्रपती शिवरायांचे शेती विषयक धोरण आणि व्यापार विषयक धोरण हा खरतर अभ्यासाचा एक मोठा विषय. पण त्या संदर्भात आपण काही पत्रे बघुया. पुणे परगण्यामधले देखमुख बापाजी शितोळे आणि देशमुख विठोजी शितोळे यांनी 'मुघलांच्या धामधूमीमुळे आमचे इतके नुकसान झाले आहे की आम्ही कर भरू शकत नाही' असे राजांना कळवले होते. त्यांचा हा अर्ज राजांनी मान्य करून त्यांचा कर रद्द केला आहे. प्रजा नियमासाठी नव्हे तर नियम प्रजेसाठी आहेत हे त्यांना सर्वथा ठावूक होते. आवश्यक तेंव्हा नियमात बदल करून धोरणे राबवता येतात हे ह्याचे उत्तम उदाहरण. कोकणात जम बसल्यावर राजांनी कोकणातील व्यापार वाढविला होता. दाभोळ येथे नारळांची विक्री अतिशय कमी किमतीत होऊ लागल्याने त्याचा परिणाम आजूबाजूच्या व्यापारावर होऊ लागला. तेंव्हा राजांनी आपल्या सुभेदाराला पत्र लिहिले. राजे म्हणतात,'दाभोळास नारळ कमनिर्खे विकते हा अंमल कैसा आहे?' पोर्तुगीझांच्या ताब्यातील व्यापारी मीठ कमी किमतीत विकत असल्याने स्वराज्यातील मीठ व्यापारयांना कोणी भाव देईना. आपल्या व्यापारयांना उत्तेजन मिळावे म्हणून राजांनी कुडाळ येथील आपला सुभेदार नरहरी आनंदराव यास पत्र लिहिले. ते म्हणतात,'बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे' ह्यावरून दिसून येते की व्यापारावर त्यांचे किती बारीक लक्ष्य होते.

प्रभानवलीचा सुभेदार रामजी अनंत यास राजांनी पाठवलेले पत्र अतिशय वेधक आहे. ५ सप्टेंबर १६७६ रोजी लिहिलेल्या ह्या पत्रात राजे म्हणतात,'येक भाजीच्या देठासहि मन नको' शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर अन्याय तर होऊ नयेच, तर त्यास योग्य त्या सवलती मिळाव्यात आणि राज्याचे उत्पन्न वाढावे असे विचार ह्या पत्रात व्यक्त करण्यात आले आहेत. याशिवाय जमिन महसूलीची पद्धत, तगाई देणे, कर्जमुक्त करणे याबाबत सविस्तर विवेचन सदर पत्रामध्ये राजांनी केले आहे. (गेल्या काहीवर्षांपासून शेतकर्‍याच्या झालेल्या अवस्थेबद्दल बोलताना, हे पत्र प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये लावले पाहिले अशी सूचन बाबासाहेब पुरंदरे यांनी मध्ये एका कार्यक्रमात केली होती.)

 
शिवछत्रपतींचे युद्ध आणि सैन्यविषयक धोरण हा अजून एक अभ्यासाचा प्रचंड विषय. सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी ह्याबद्दल सविस्तर विवेचन करणारे पत्र राजांनी ९ मे १६७४ रोजी आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांना धाडले. राज्याभिषेक अवघ्या महिन्यावर आलेला असतानाही राजांचे प्रजाहीताकडे संपूर्ण लक्ष होते. सैन्याकडून प्रजेला यत्किंचितही उपसर्ग पोहोचू नये यासाठी ते किती सतर्क असत हे ह्या पत्रावरून दिसून येते. आपल्या ३०० सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा हा राजा निराळाच. तलवार घेऊन लढाई करणाऱ्या हातांपेक्षा स्वराज्यामागे असलेले जनतेचे हात त्यांना जास्त महत्वाचे वाटले असणार. स्वराज्याचा मूळ गाभा हा किल्ले आणि त्यांची बांधणी यावर होता आणि त्यावर होणारा खर्च देखील प्रचंड होता. असाच एक किल्ला राजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना वसवायला सांगितला होता. १६५९ मध्ये 'मोहनगड किल्ला वसवावा.' असे पत्र राजांनी बाजीप्रभूंना पाठवले आहे. तटबंदीचे काम करणे आणि गडावर वसाहत बसवणे असे सांगून बांधकाम एका पावसाळ्यात मोडकळीस यायला नको ते मजबूत असावे असे त्यांनी म्हटले आहे. शिवरायांना दुर्गबांधणी या विषयात प्रचंड दूरदृष्टी होती. १६७७ मध्ये दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान चेन्नई येथील जिंजी किल्ल्याचे बांधकाम राजांनी करवून घेतले. ते बघून फ्रेंच मार्टिन त्याच्या डायरीत म्हणतो,"त्यांनी केलेले बांधकाम हे अभूतपूर्व आहे. युरोपातल्या कुठल्याही बांधकाम तज्ञाला असे बांधकाम करण्याचा विचार देखील सुचणार नाही."

या भागात आपण शिवरायांसंदर्भात काही पत्रे पाहिली. पुढच्या भागात आपण अफझलखान, शाहिस्तेखान, मिर्झाराजा, व्यंकोजी भोसले, दक्षिण दिग्विजय मोहीम अशी राजकारणाचा विस्तृत पट मांडणारी पत्रे बघू...

 

शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व ... भाग २


ज्या दुर्मिळ पुस्तकातून मी पत्रे संकलित करून लिहितो आहे त्या पुस्तकाबद्दल आपण गेल्या भागात पहिले. काही पत्रांच्या संदर्भाने राजांबद्दल अधिक जाणून सुद्धा घेतले. ह्या भागात आपण राजांनी लिहिलेली राजकारण विषयक पत्रे बघूया...

येत्या १० नोव्हेंबर रोजी आहे ३५१ वा शिवप्रताप दिवस. शिवप्रतापदिवस म्हणजे ज्यादिवशी राजांनी प्रतापगडाच्या साक्षीने अफझलखानाला ठार मारले तो दिवस. जी जावळी घेण्यासाठी खान आला होता त्या जावळीकडे आणि तिथल्या चंद्रराव मोरेकडे राजांचे लक्ष १६५१ पासूनच होते. चंद्रराव मोरे याने जेंव्हा बीरवाडीच्या माल आणि बाजी पाटील यांची वतने बळकावली तेंव्हा त्यांनी येऊन शिवरायांपुढे गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या अधिकारपणाला मान्यता देताना राजे म्हणतात,"तुम्ही अधिकारपण खाउनु अधिकारपणाची चाकरी करणे"  जेंव्हा खानाचे आक्रमण झाले तेंव्हा राजांनी त्याला पाठवलेल्या पत्राचा स्वैर मराठी अनुवाद तुम्हाला येथे वाचता येईल. पत्रात राजांनी खानाच्या सैन्याला जावळीच्या खोऱ्यात जगातल्या सर्व सुखसोयी उपभोगता येतील असे म्हटले होते. अर्थात त्यांना कश्या सुखसोई पोचवल्या गेल्या हे सर्वश्रुत आहेच!!! खानस्वारी पाठोपाठ मुघलांनी शास्ताखानाला (शाहिस्तेखानाला) दख्खन मोहिमेवर धाडले. औरंगाबादवरून निघालेल्या शाही फौजा थेट पुण्यात शिरल्या आणि सर्वत्र नासधूस करू लागल्या. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.

१६५९ च्या शेवटाला केलेला खानवध आणि नंतर कोल्हापूरपावेतो मारलेली धडक, पन्हाळा आणि जुलै १६६० मधला बाजी-फुलाजी प्रभूंचा भीम पराक्रम, वेढ्यातून सुटून आल्यावर १६६३ मध्ये खुद्द शाहिस्तेखानाची राजांनी छाटलेली बोटे ह्या सर्वात दख्खन पेटून उठले होते. गेल्या ३-४ वर्षात दख्खनेत झालेली हानी भरून काढण्यासाठी राजांनी सुरत बेसुरत करून प्रचंड लुट प्राप्त केली. आत्मविश्वास कैक पटींनी वाढलेल्या राजांनी दख्खन मुघल सुभेदाराला पत्र पाठवले. मूळ पत्र फारसीमध्ये असले तरी त्याचा मराठी अनुवाद येथे देत आहे. स्वराज्य निर्मितीसोबत त्याचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी आक्रमकांशी युद्ध खेळण्यास जागृक राहणे याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ह्या पत्रातून त्यांचा आत्मविश्वास आणि निर्धार दिसून येतो.ह्या पत्रात राजे म्हणतात,"आपल्या भुमीचे संरक्षण करणे हे माझे कर्त्तव्य आहे आणि मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही." हे संपूर्ण पत्र वाचावे असे आहे.

"आज तीन वर्षे बादशहाचे मोठे मोठे सल्लागार आणि योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत, हे तुम्हा सर्वांस माहिती आहेच. बादशहा हुकुम फर्मावतात,'शिवाजीचा मुलुख आणि किल्ले काबीज करा.' आणि तुम्ही जवाब पाठविता 'आम्ही लवकरच काबीज करतो.'

आमच्या या दुर्गम प्रदेशात कल्पनेचा घोडा सुद्धा नाचविणे कठीण आहे, मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला? भलत्याच खोट्या बातम्या लिहून पाठवण्यात तुम्हाला लाज कशी वाटत नाही? (विजापूरचे) कल्याणी आणि बिदरचे किल्ले उघड्या मैदानात होते ते तुम्ही काबीज केले. आमचा प्रदेश अत्यंत डोंगराळ आहे. नदी-नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे साठ किल्ले माझे आज तयार आहेत. पैकी काही समुद्र किनाऱ्यावर आहेत. बिचारा अफझलखान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्यूमुखी पडला. हा सर्व प्रकार तुम्ही बादशहास का कळवीत नाही? अमीर उल उमराव शाहिस्तेखान आमच्या या गगनचुंबित डोंगरात आणि पाताळात पोचणाऱ्या खोऱ्यांत तीन वर्षे सारखा खपत होता. 'शिवाजीचा पाडाव करून लवकरच त्याचा प्रदेश काबीज करतो' असे बादशहाकडे लिहून लिहून थकला. ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा सर्वांच्या समोर आहे.

आपल्या भूमीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरीही मी माझे कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही."

१६६४ मध्ये आदिलशाही सरदार खवासखान याने शिवरायांवर स्वारी केली. राजे पुन्हा एकदा कोकणात उतरले आणि त्यांनी विजापूरचा प्रदेश अधिक जोमाने काबीज करायला सुरवात केली. खवासखान, बाजी घोरपडे आणि खेम सावंत या त्रिकुटाचा शिवरायांनी एकत्र न होऊ देता एकएकटे पाडून बिमोड केला शिवाय पोर्तुगीज मुलुख सुद्धा काबीज केला तेंव्हा त्यांना धाक बसून त्यांनी नजराणा देखील पाठवला. आपल्या आऊसाहेब जिजामाता यांस लिहीलेल्या पत्रात ते म्हणतात,"स्वामींचे पुण्यप्रतापें आज्ञेप्रमाणे घडून आलें."  राजांनी संपूर्ण कोकणावर ताबा मिळवत आता सिंधूदुर्गाचा पाया घातला आणि आपला आरमारी दरारा वाढवा म्हणून पहिली आरमारी मोहीम काढली. १६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते. त्याबद्दल आपण पुढच्या भागात माहिती घेऊ...

 

... भाग ३


स्वराज्यावरील संकटे काही थांबायचे नाव घेत नव्हती. १६५९ च्या अफझलखान स्वारीपासून सुरू झालेली ही सत्वपरीक्षा राजे प्रत्येक वेळी निभावून नेत होते. कधी स्वतःच्या जीवावर उदार होऊन तर कधी स्वतःच्या अतिशय प्रिय आणि जवळच्या माणसांचा त्याग भोगून. १६६४ साली राजांनी कोकणात यश प्राप्त केलेले असले तरी १६६५ च्या सुरवातीला 'ती' बातमी मराठा हेरांनी राजांपर्यंत पोचवली. मुघलांचा सेनापती मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येत होता. पुढे ३ महिन्यात मराठा - मुघल तह घडला. पुरंदरचा तह हा मराठा इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरला. हा तह व्हायच्या आधी राजांनी जयसिंगला एक विस्तृत पत्र लिहिले होते. हे संपूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."

'हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळे राजपुतांची मान उन्नत आहे. तुझ्यामुळे बाबरवंशाची राज्यलक्ष्मी अधिक प्रबळ झाली असून तुझे सहाय तिला मिळत आहे. हे प्रबळ आणि प्रौढ जयशहा! सीवाचा प्रमाण व आशीर्वाद स्वीकार. परमेश्वराने तुझे रक्षण करून तुला धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखवावा. मी असे ऐकले आहे की, मजवर हल्ला करण्यासाठी व दख्खन जिंकण्यासाठी तू आला आहेस. हिंदूंचे हृद्य व रक्त यांच्या रक्ताने तू जगात यशस्वी होऊ पहात आहेस. पण तुझ्या हे लक्ष्यात आलें नाही की याने तुझ्या तोंडास काळोखी फासली जात आहे, कारण तुझ्या या कृत्याने देशावर व धर्मावर आपत्ती ओढवली आहे. जर तू क्षणमात्र अंतर्मुख होऊन आपल्या हाताकडे आणि झग्याकडे विवेकदृष्टीने पाहशील तर हा रंग कोणाच्या रंगाचा आहे व या रंगाचा रंग इहपरलोकी काय होणार हे तुला समजेल.

जर तू आपणहून दक्षिण देश जिंकण्यास आला असतास तर माझे शीर व डोळे तुझ्या रस्त्यावर बिछान्याप्रमाणे पसरले असते, मी तुझ्या घोड्याबरोबर मोठी सेना घेऊन आलो असतो आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची भूमी तुला जिंकून दिली असती. पण तू  सज्जनांना फसविणाऱ्या औरंगजेबाच्या थापास भूलुन इकडे आला आहेस. तेंव्हा यावेळी तुझ्याशी कोणता डाव खेळावा हे मला समजेनासे झाले आहे. जर तुला सामील व्हावे, तर त्यात मर्दपणा नाही, कारण मर्द लोक प्रसंगाची सेवा करीत नाहीत. सिंह कधी भित्रेपणा दाखवत नाही. बरे, जर मी तलवार व कुऱ्हाड यांचा उपयोग केला तर दोनही बाजूंनी हिंदुंचीच हानी होणार. मोठ्या दु:खाची गोष्ट ही आहे की, मुसलमानांचे रक्त पिण्याखेरीज इतर कामासाठी माझ्या तलवारीस म्यानातून बाहेर पडावे लागेल! जर या लढाईसाठी स्वतः: तुर्क आला असता तर आम्हा वीरपुरुषांना घरबसल्या शिकार साधल्यासारखे झाले असते. पण जेंव्हा अफझलखान न शाईस्ताखान यांच्या हातून काम झेपत नाही असे दिसले तेंव्हा तुला आम्हाशी युद्ध करण्याकरीता नेमले आहे. कारण स्वतः: औरंगजेब आमचा मारा सोसण्यास समर्थ नाही. हिंदूलोकांत कोणी बलशाली राहू नये आणि सिंहांनी आपसांत लढून घायाळ व शांत व्हावे आणि गिधाडांना जंगलाचे स्वामित्व प्राप्त व्हावे, अशी औरंगजेबाची इच्छा आहे. ही गूढनीती तुझ्या ध्यानात येत नाही ह्यावरून त्याच्या जादूने तुला भूल पडली आहे असे प्रत्ययास येते.

तू जगात बरेवाईट पुष्कळ प्रसंग पहिले असशील. बागेत तू फुले आणि कंटक या दोघींचाही संचय केला असशील, पण आम्हा लोकांशी युद्ध करून हिंदूंचे शीर धुळीत मिळवण्याचे काम मात्र तू करू नये. प्रौढ वयात अल्लडपणा न करता सादीच्या त्या वचनाचे स्मरण कर, "सर्वच ठिकाणी घोडा फेकता येत नाही. कधी कधी ढाल फेकून पळून जाणे योग्य असते." व्याघ्र मृगादि प्राण्यांवर व्याघ्रता करतो, पण सिंहाबरोबर गृहयुद्ध करण्यास प्रवृत्त होत नाही. जर तुझ्या तीक्ष्ण तलवारीत पाणी असेल व घोड्यात दम असेल तर हिंदू धर्माच्या शत्रूंवर हल्ला करून इसलामाचे जड मूळ खोडून टाक.

जर या देशाचे राज्य दारा शिकोह (१) यास मिळाले असते तर आम्हा लोकांवर त्याने कृपा, अनुग्रह केला असता पण तू जसवंतसिंहास दगा दिलास व उच्चनीच याची पारख तुला करता आली नाही. आजवर किरकोळ शत्रूंशी गाठ पडल्यामुळे तुझा दम कायम राहिला आहे. परंतु तू आता सिंहाशी युद्ध करण्याची धिटाई करून आला आहेस. एवढ्या धावपळीने तुला काय मिळत आहे? तू मृगजळाच्या मागे धावत आहेस. एखाद्याने फार परिश्रम करून एखादी सुंदरी हस्तगत करावी आणि ती आपल्या शत्रूच्या स्वधील करावी, अशा तूच्छ व्यक्तीसारखा तू आहेस! तू या निचाच्या कृपेचा काय अभिमान धरतोस? जुझारसिंहाच्या (२) कामाचा परिणाम तुला लक्ष्यात नाही? कुमार छत्रसाल (३) यावर तो (औरंगजेब) कशाप्रकारची आपत्ती आणू पाहत होता, हे तू जाणतोस. याखेरीज इतर हिंदू लोकांवर या दृश्ताच्या हाताने काय काय अनर्थ आली आहेत हेही तुला माहित आहे. इष्ट हेतू साधण्यासाठी तो बापाचा व भावाचा खून पाडण्यास भीत नाही. राजभक्तीची सबब संगत असशील तर तू शहाजहानशी कसे वर्तन केलेस याचे स्मरण कर.

जर विधात्याने तुला अकलेचा अंश दिला असेल व मार्द्पानाची चाड असेल तर तू आपल्या जन्मभूमीच्या संतापात आपली तलवार तापीव व अत्याचाराच्या दु:खाने पडणार्या आसवांनी तिला पाणी दे. हा प्रसंग आम्ही लोकांनी आपसांत लढण्याचा नाही. कारण हिंदू लोकांवर यावेळी मोठे कठीण कार्य येऊन पडले आहे. आमची पोरेबाळे, देश, धन, देव व पवित्र देवपुजक या सर्वांवर त्याच्यामुळे पराकाष्ठेचे दु:ख कोसळले आहे. आणि हाच क्रम आणखी काही दिवस चालेल तर आम्हा हिंदू लोकांचे चिन्ह देखील पृथ्वीवर राहणार नाही! मुठभर मुसलमानांनी आमच्या एवढ्या देशावर प्रभुत्व गाजवावे ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व त्यांच्या पराक्रमाचे फळ नव्हे. जर तुला अकलेचे डोळे असतील तर पहा. आम्हाबरोबर तो कशा गोड गोष्टी बोलतो व चेहऱ्यावर कसे कसे रंग आणितो, आमच्या पायात आमचीच बेडी अडकीवितो व आमच्याच तलवारीने आमची शिरे कशी कापितो ते लक्ष्यात घ्या. आम्ही लोकांनी ह्यावेळी हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदूधर्म यांच्या संरक्षणार्थ फार जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. तलवारीस पाणी देऊन तुर्काचा जबाब तुर्कीतच दिला पाहिजे.

जर तू मारवाडचा राजा जसवंतसिंह  व मेवाडचा राजा राजसिंह यांच्याशी ऐक्य करशील, तर फार मोठे काम होईल अशी अशा आहे. चोहीकडून उठावणी करून तुम्ही या सर्पाचे डोके दगडांनी ठेचून टाका. म्हणजे काही काळापर्यंत तरी त्याला दक्षिण प्रांतात आपले जाले पसरता येणार नाही. तेवढ्यात मी व माझे भालेबहाद्दर वीर विजापूर व गोवळकोंडा येथील दोन्ही बादशहांना जिंकतो. मेघासारखी गर्जना करणाऱ्या सैन्यानिशी मुसलमानांवर तलवारीचा पाउस पाडीन आणि सर्व दक्षिणदेशाच्या पटावरून इसलामाचे नाव किंवा चिन्ह धुवून टाकीन. त्यानंतर कार्यदक्ष वीर व भाला चालविणारे घोडेस्वार यांना बरोबर घेऊन प्रचंड लाटा व कोलाहल माजविणाऱ्या नदीप्रमाणे दक्षिण देशातील पहाडातून बाहेर पडून मैदानात येईन, आणि अत्यंत जलदीने तुम्हा लोकांच्या सेवेस हजर होईन व तुम्हास हिशेब विचारीन. चोहीकडून भयंकर युद्ध उपस्थित करून रणांगणात दंगल माजवून आम्ही लोक आमच्या सेनेच्या लाटा दिल्ली येथील त्याच्या जर्जर झालेल्या घरात पोहचवू. म्हणजे त्याच्या नावाचे औरंगहि राहणार नाही न जेबहि राहणार नाही. तसेच त्याची तलवार राहणार नाही व कपाटाचे जाळेही राहणार नाही. शुद्ध रक्ताने भरलेली नदी वाहवून आम्ही आमच्या पितरांच्या आत्म्याचे तर्पण करू. हे काम काही फार कठीण नाही. फक्त हृद्य व डोळे व हात यांची आवशक्यता आहे. दोन अंत:करणे (शिवराय व जयसिंह) एक होतील तर पहाड तोडता येईल व मोठ्या सैन्याच्या समूहाच्या ठीकरया उडविता येतील. या विषयासंबंधी मला तुझ्याशी फार बोलणे चालणे करावयाचे आहे, ते पत्री लिहिणे संयुक्तिक नव्हे. तू म्हणशील तर मी समक्ष तुझ्या भेटीस येईन, माझा बेत तुला कळवीन. तलवारीची शपथ, घोड्याची शपथ, देवाची शपथ व धर्माची शपथ घेऊन मी सांगतो की, असे करण्याने तुझ्यावर आपत्ती येणार नाही.

अफझलखानाचा शेवट कसा झाला हे लक्षत आणून तू शंकित होऊ नकोस. त्याने बाराशे लढवय्ये हबशी माझा घात करण्यासाठी ठेविले होते. त्याच्यावर मी प्रथमच हात चालविला नसता तर यावेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते? मला तुझ्यापासून अशी भीती नाही. कारण तुझ्यात माझ्यात काही शत्रुत्व नाही. जर मला माझे उत्तर अनुकूल आलें तर रात्री मी एकता तुझ्या भेटीस येईन. शाहस्तेखानाच्या खिशातून मी जे पत्र काढून घेतले आहे ते गुप्त पत्र मी तुला दाखवीन, तुझ्या डोळ्यावर संशयाचे पाणी शिंपडून तुझी सुखनिद्रा नाहीशी करीन. तुझ्या स्वप्नाचा खरा फलादेश करून नंतर तुझा जबाब घेईन.

जर या पत्राचे उत्तर माझ्या मनजोगे न येईल तर मी आणि माझी तीक्ष्ण तलवार आहे व तुझी सेना आहे. उद्या सूर्य आपले मुख संध्याकाळात लपवील तेंव्हा माझा अर्धचंद्र (तलवार) म्यानातून बाहेर पडेल. बस्स. कल्याण असो.

**********************************************************************************
(१) दारा शिकोह हा शहाजहानचा मोठा मुलगा आणि औरंजेबाचा वडीलबंधू होता. शहाजहान मागून गादीवर तो बसू नये म्हणून औरंगजेबाने जयसिंहमार्फत जसवंतसिंहाला पत्र पाठवून त्याचे मन कलुषित केले आणि दारा यास कुठलेली सहाय्य मिळू दिले नाही. पुढे औरंगजेबाने त्याचा पराभव केला आणि त्याला ठार मारले.

(२) जुझारसिंह बुंदेला हा शहाजहानचा एकनिष्ठ जहांगीर होता. पुढे मात्र औरंगजेबाने त्याचे संपूर्ण राज्य काढून घेतली, त्याला पदच्युत केले आणि जुझारसिंहाला अक्षरश: जंगलातून वणवण फिरावे लागले.

(३) छत्रसाल बुंदेला यावर औरंगजेबाने मोठी आपत्ती आणली होती. छत्रसालचे वडील चंपतराय यांनी खरेतर औरंगजेबाला खूप सहाय्य दिलेले होते. पुढे आपले राज्य परत घेण्यासाठी चात्रासाल शिवरायांना राजगडी येऊन भेटले.
**********************************************************************************

महिकावतीची बखर

 http://itihasachyasakshine.blogspot.com/2011/05/blog-post_17.html
 

महिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...


महिकावतीची बखर ही १४ व्या ते १६ व्या शतकात लिहिली गेली असल्याने ह्यात जुन्या मराठी शब्दांचा प्रचंड समावेश आहे. कै. राजवाडे यांनी बखरीमधल्या एकूण शब्दांची संख्या मोजली ती सुमारे १२ हजार इतकी भरली. ह्यात १०३ यावनी उर्फ फारशी शब्द आलेले आहेत असे त्यानी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १२ हजारात फक्त १०३ शब्द म्हणजे मुसलमानी सत्ता येऊनही रोजच्या व्यवहारात डोईजड होईल इतकी ती कोकणात तरी फैलावली नव्हती असेच म्हणावे लागेल. संपूर्ण बखरीमध्ये उत्तर कोकण म्हणजे मुंबई - ठाणे आणि आसपास परिसरातील गावांची, किल्ल्यांची आणि प्रांतांची एकूण ३९६ नावे आलेली आहेत. त्यातील महत्वाची आणि मोजकी ६० नावे पुढे देत आहे. त्यांच्या जुन्या नावांपुढे सध्याची नावे कंसात दिलेली आहेत...

१. आगाशी (आगाशी- विरार जवळ)
२. उतन (उत्तन - भाईंदर जवळ)
३. कळवे (कळवा - ठाणे शहर)
४. कान्हेरी  (बोरीवली)
५. कोंडीवटे (कोंदिवडे - कर्जत - राजमाची पायथा)
६. आन्धेरी (अंधेरी)
७. कानझुरे (कांझूर - कांझूरमार्ग)
८. कालिणे (कालिना - सांताक्रूझ)
९. कोपरी (कोपरी - ठाणे पूर्व)
१०. कोलसेत (कोलशेत - ठाणे - घोडबंदर)
११. उरण (उरण)
१२. आसनपे (आसनगाव?)
१३. कल्याण (कल्याण)
१४. कांधवळी (कांदिवली)
१५. खरडी (खर्डी - कसारा जवळ)
१६. घोडबंदर (घोडबंदर ठाणे)
१७. चेउल (चौल - अलिबाग)
१८. डिडोशी (दिंडोशी) 
१९. तांदूळवाडी पैलदेची (तांदूळवाडी - पालघर जवळ)
२०. ताराघर (तारापूर - पालघरजवळ)
२१. तुरफे (तुर्भे)
२२. गोराई (गोराई)
२३. चरई (चरई - ठाणे पश्चिम)
२४. चेने (चेना - ठाणे घोडबंदर)
२५. चेंभूर (चेंबूर)
२६. जवार (जव्हार)
२७. डोंगरी (डोंगरी - मुंबई)
२८. दहीसापूर (दहिसर?)
२९. गोरगाव (गोरेगाव)
३०. चेंदणी (चेंदणी - ठाणे खाडीकडील भाग)
३१. जुहू (जुहू)
३२. तळोजे महाल (तळोजा - पनवेलजवळ)
३३. दांडाळे (दांडाळेतळे वसई)
३४. नागावे (नायगाव)
३५. बोरवली (बोरीवली) 
३६. भाईखळे (भायखळा)
३७. महिकावती (माहीम - पालघर)
३८. बिंबस्थान (केळवे - पालघर)
३९. देवनरे (देवनार)
४०. नाउर (नाहूर - मुंबई)
४१. मणोर (मनोरी - मुंबई)
४२. मागाठण (मागाठणे - मुंबई)
४३. वरोळी (वरळी)
४४. वासी (वाशी)
४५. वाळुकेश्वर (वाळकेश्वर)
४६. वेउर (येऊर - ठाणे)
४७. वोवळे (ओवळे - ओवळा - ठाणे घोडबंदर)
४८. वरसावे (वर्सोवा)
४९. वांदरे (बांद्रा - मुंबई)
५०. विह्रार (विरार)
५१. माझिवडे (माजिवडा - ठाणे घोडबंदर)
५२. काशीमिरे (काशीमिरे - मीरारोड मधील)
५३. सीरगाव (शिरगाव - पालघर)
५४. मुंबई (मुंबई)
५५. मुळूद (मुलुंड) 
५६. सानपे (सानपाडा?)
५७. साहार (सहार - मुंबई विमानतळ भाग)
५८. सीव (शिव - सायन)
५९. साष्टी (ठाणे परिसर)
६०. सोपारे (नालासोपारा)

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ३ : प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी ...

 

महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...


शके १०६० (इ.स. ११३८)ची गोष्ट. सरस्वतीनदीच्या काठी असलेल्या पालणपुर देशात अणहिलवाडपाटणवर चौलुक्य उर्फ सोळंकी नावाचे राजे राज्य करीत होते. त्यांच्या चंपानी उर्फ चांपानेर नावाच्या संस्थानावर बिंब ह्या आडनावाचे एक सूर्यवंशी क्षत्रिय कुल त्यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. ह्या बिंबांचा पैठण येथे राज्य करणाऱ्या भौम या क्षत्रिय राजघराण्याबरोबर घनिष्ट संबंध होता. भौम राजघराणे जसे महाराष्ट्रिक होते तसे चौलुक्य आणि बिंब देखील महाराष्ट्रिकच होते.

शके १०६० साली गोवर्धन बिंब हा बिंब घराण्याचा राजा होता. त्याचा लहान भाऊ प्रताप बिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करण्याची योजना शके १०६० मध्ये आखली. त्यावेळी उत्तर कोकणावर शिलाहारांचे राज्य होते. दक्षिण कोकणातील शिलाहारांचे राज्य कदंबांनी हिसकावून घेतलेले होते. गेली ५० वर्षे शिलाहार आणि कदंब यांच्या लढायांमध्ये कोकणात गोंधळ माजलेला होता आणि शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली होती. अशातच उत्तरेकडून चढाई करण्याचा मनोदय प्रताप बिंब याने नक्की केला. सोबत ८ प्रमुख अधिकारी आणि १० हजार फौज घेऊन तो मोहिमेस निघाला.

प्रताप बिंब चांपानेरवरून निघाला तो थेट नर्मदा उतरून, पैठण येथे भौम राजाकडे गेला. तिथे तो संपूर्ण फौजेसह तब्बल २ वर्ष राहिला. प्रताप बिंबला मोहिमेवर निघताना बहुदा पैशाची बरीच अडचण होती असे दिसते नाहीतर तो २ वर्षे काहीही न करता पैठण येथे बसून राहिला नसता. भौम राजाने सुद्धा त्याला जवळ ठेवून घेतले आणि त्याच्या १० हजार फौजेचा खर्च पाहिला याचा अर्थ त्यांच्याच निश्चित जवळचे संबंध होते. अखेर २ वर्षांनी त्याने पैशाची व्यवस्था लावली आणि तो मुंबई-ठाणे भागावर चाल करून आला. यायचा मार्ग मात्र त्याने थोडा उत्तरेवरून घेतला होता. पैठणवरून जुन्नरकडे आल्यावर तो घाट उतरून खाली यायच्या ऐवजी वर गेला आणि दमण म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र-गुजरात उत्तर सीमाभागाकडून खाली चाल करून आला. कदाचित थेट हल्ला करण्याऐवजी उत्तरेकडून भगदाड पाडत खाली येणे त्याला जास्त सोपे वाटले असावे. ह्या वाटचालीत त्याला हरबाजी देशमुख हा शूर लढवय्या सामील झाला. भौमराजाने सुद्धा निघताना प्रतापबिंबला स्वतःकडची २ हजाराची फौज दिली. त्या फौजेचे नेतृत्व करायला त्याने सोबत दिला होता बाळाजी शिंदे. हा बाळाजी युद्धात प्रखर म्हणून प्रचंड नावाजलेला होता.

प्रताप बिंबाच्या फौजेने सर्वप्रथम  दमण प्रांतावर हल्ला चढवला. तिथे राज्य करीत असलेला काळोजी सिरण्या नामक राजा प्रताप बिंबास लगेचच शरण आला. कालोजीच्या हाताखाली असलेला दमण ते चिखली हा भाग बिंबाने ताब्यात घेतला. प्रताप बिंबाने तेथील व्यवस्था पाहण्यासाठी हरबाजी कुळकरणी (कुलकर्णी) नावाचा अधिकारी नेमला आणि तो पुढे निघाला. उंबरगाव - डहाणू - तारापूर करत तो महिकावतीस उर्फ माहीम येथे येऊन पोचला. तेथे विनाजी घोडेल म्हणून कोणी राजा राज्य करीत होता. त्यास बिंबाने दूर सारले आणि देशाची स्थिती अवलोकन केली. त्यास असे आढळले की, शिलाहारांसारख्या सुसंस्कृत मराठ्यांच्या हातून अश्या शुल्लक लोकांच्या हाती इथली सत्ता गेल्यामुळे सुपीकता ओसरून, प्रदेश देशोधडीला लागला होता. नयनरम्य असे समुद्रतीर वैराण आणि उद्वस्त झालेले होते. हे सर्व पाहून प्रतापबिंब खूप दु:ख्खी झाला. त्याने पैठण आणि चांपानेरवरून ब्राह्मण आणि मराठे लोक आणून इथली वसाहत पुन्हा स्थिरस्थावर करावयाचा निर्णय घेतला. तसे पत्र त्याने आपला मोठा भाऊ गोवर्धन बिंब आणि पैठणला भौमाकडे रवाना केले. आपला पुत्र मही बिंब यास देखील इथे धाडून द्यावे असे त्याने आपल्या मोठ्या भावाला कळविले.

दुसरीकडे प्रताप बिंबाने आपला मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी याला ठाणे - साष्टी आणि मुंबईचा मुलुख काबीज करण्यासाठी पाठविले. त्याच्यासोबत किती फौज दिली हे मात्र बखर स्पष्ट करीत नाही. बाळकृष्णराव सोमवंशी याने पहिल्याच फटक्यात ठाण्यावर हल्ला चढवत यशवंतराव शिलाहार (शेलार) याला ठार केले आणि शिलाहारांची उरली सुरली सत्ता ठाण्यातून उपटून टाकली. बाळकृष्णराव सोमवंशी पुढे खाडी ओलांडून कळवा येथे पोचला. तेथे कोकाट्या नावाच्या कोण्या मराठ्याचा अंमल होता. तो बाळकृष्णरावास शरण आला. बाळकृष्णराव तिथून मुंबईच्या दिशेने निघाला आणि मढ येथे पोचला. तिथून तो जुहू मार्गे वाळूकेश्वरी पोचला. तिथे असलेले बाणगंगा तीर्थ आणि हनुमानाच्या प्रतिमा पाहून तो निश्चित आनंदाला असेल. त्याने फौजेसकट तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि 'येथील सर्व देश रान होऊन गेला आहे. आपण स्वतः: एकदा येऊन पहावा' अश्या आशयाचे पात्र प्रताप बिंबास पाठविले. प्रताप बिंबाने माहीम प्रांताप्रमाणे वाळूकेश्वरी देखील वसाहत बसविण्याचा निर्णय केला.

प्रताप बिंबास दमण ते महिकावती आणि बाळकृष्णराव यास महिकावती ते वाळुकेश्वर हे अंतर पार करायला फार तर २ महिने लागले असावेत. गेल्या ५० वर्षातील लढाया - जाळपोळ यांनी प्रदेश इतका वैरण होऊन गेला होता की हा संपूर्ण प्रदेश हातात घ्यायला बिंबास फार प्रयास पडले नाहीत. पण खरे प्रयास पुढे होते. बाहेरून लोक आणून देश पुन्हा बसविणे हे काम नक्कीच सोपे नव्हते. १६४२-४४ मध्ये दादोजी कोंडदेव आणि मासाहेब जिजामाता यांना पुणे वसवताना जे कष्ट करावे लागले तेवढेच किंवा त्यापेखा जास्त कष्ट प्रताप बिंबास पडले असावेत. शेती, ग्रामसंस्था, व्यापार-उदीम हे पुन्हा सुरू व्हावे यासाठी त्याने काही निश्चित धोरणे आखली असतील. इ.स. ११४० मध्ये स्वतःच्या राजधानीचे गाव म्हणून त्याने केळवे-माहीम निश्चित केले. त्याचे कारण बखरकार असे सांगतो की, दमण ते वाळुकेश्वर हे अंतर २८ कोस असून (आजच्या भाषेत ८४ मैल किंवा १३४ किमी.) केळवे-माहीम हा त्याचा मध्य बिंदू आहे. राजधानीचे ठिकाण बनवूनही त्याने तिथे काही विशेष बांधकाम केले असावे असे वाटत नाही. कारण आज कुठल्याच प्रकारचे अवशेष संपूर्ण केळवे-माहीम प्रांतात आढळत नाहीत. पैशाची टंचाई आणि देश वसाहत बसवायच्या जबाबदारी मुळे त्याने बहुदा ते टाळले असावे.

काही महिन्यात प्रताप बिंबाचा मुलगा मही बिंब चांपानेर वरून महिकावतीस पोचला. त्याने देश वसाहत वसवण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते. त्यात ६६ मुख्य कुळे होती. बखरकार लिहितो की त्यात २७ सोमवंशी, १२ सूर्यवंशी आणि ९ शेषवंशी कुळे होती. या शिवाय वाणी, उदमी, गुजर, वैश्य, लाड, दैवज्ञ अशी काही कुळे होती. भौमाने जी कुळे पैठणवरून पाठवली त्यात मुख्य ब्राह्मण कुळे होती. शास्त्री, वैदक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित ही यादी बखरकार देतो. ह्यातील प्रमुख कुळे घेऊन प्रताप बिंब वाळुकेश्वर येथे गेला. बाळकृष्णराव फौजेसकट जिथे मुक्काम करून होता तिथे त्याने स्वतःचा राज्यारोहणसमारंभ करून घेतला. ह्या समारंभानिमित्ताने त्याने शेषवंशीयांचे कुलगुरु असणाऱ्या गंगाधर नाईक सावखेडकर यांस पसपवली गाव तर राजपुरोहित असणाऱ्या विश्वनाथपंत कांबळे यांस पाहाड गाव इनाम दिला. प्रताप बिंब स्वतः काही काल वाहिनळे - राजणफर येथे राहिला आणि मग कान्हेरी येथील गुहेमध्ये देखील त्याने काही काळ मुक्काम ठोकला. मरोळ येथील महाळजापूर (एकूण २२ गावे), मालाड येथील नरसापूर (एकूण २२ गावे), उत्तन (२२ गावे) आणि घोडबंदर (एकूण ३३ गावे) अश्या विविध ठिकाणी त्याने नवीन वसाहत बसविली. ३ वर्षाकरिता व्यापारी जकात नाही असा बंदोबस्त देखील केला.

आज मुंबईमध्ये पसपवली, पाहाड, वाहिनळे - राजणफर ही गावे कोठे आहेत? ह्याबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ४ : मही बिंबाची ठाणे - कोकणची राजवट 
 
 

महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...


नागरशा राज्यभ्रष्ट झालेला पाहून भागडचुरी अर्थात आनंदला होता.  प्रांताचा संपूर्ण कारभार मलिक भागडचुरीवर सोपवून होता त्यामुळे भागडचुरी आता अधिकच उद्दाम झाला होता. त्याने पुन्हा सोम देसायाशी असलेले जुने वैर उकरून काढले आणि जिच्यावर भागडचुरीची वाईट नजर होती त्या स्त्रीच्या माहेरच्या लोकांवर म्हणजे भाईदरच्या पाटलावर आरोप केले. सरकारच्या ३२ हजार सजगणी (सजगणी हा नाण्याचा प्रकार असून त्याचे मूल्य २ पैसे असे) पाटलाने खाल्याचा खोटा आरोप भागडचुरीने पाटलावर केला आणि त्यास कैद करून टाकले. शेवटी सोम देसला याने ते पैसे सरकारात जमा करून पाटलास सोडवून आणले. आता भागडचुरीने मलिकांचे काम भरले की हा सोम देसला लुच्चा असून त्यास दस्त करावयास हवे. मलिकने निष्कारण सोम देसला याला १६ हजार दाम दंड भरावयास सांगितले. ह्यावर सोम देसलाने नाराजी व्यक्त करून तो भरायला नकार दिला.

बास.. इतके कारण पुरे होऊन मालिकाने त्याची देसाई काढून भागडचुरीला देऊ केली. पण भागडचुरीला देसायाला संपवायचेच होते. त्याने

सोम देसला किंवा त्याचा भाऊ पायरुत याला जीवे मारल्याखेरीज देसाय पद घेणार नाही असे मलिकला कळवून टाकले. झाले.. ह्यावरून मालिकाने सोम देसला आणि त्याचा भाऊ पायरुत ह्यांना दिल्ली येथे नेऊन बादशहाकरवी त्यांचे जीव घेतले. बखर म्हणते की, बादशहाने पायरुताची चामडी सोलून त्यास ठार केले तर सोम देसल्याचे पोट चिरून, त्याच्या आतड्याची वात वळून आणि चरबीचे तेल जाळून, त्याचा दिवा लाविला. ही असली क्रूर आणि भयानक शिक्षा सोम देसल्याला आणि त्याच्या भावाला मिळाल्याने संपूर्ण भागात भागडचुरीची दहशत बसली. पण पायरुतचा मुलगा दादरुत ह्याला मात्र भागडचुरीचा बदला घ्यायचा होताच. त्याने पुन्हा विश्वासातील लोक जमवून भागडचुरी आणि कमळचुरी यांवर हल्ला चढवला. कमळचुरी जागीच ठार झाला पण भागडचुरी पुन्हा पळू लागला. ह्यावेळी मात्र तो फार पळू शकला नाही. कोणा गोम तांडेलाने कोयती हाणून त्याचा वध केला आणि दादरुतची वाहवा मिळवली.

भागडचुरीचा असा अंत झाल्याचे पाहून मलिक देखील सावध झाला. लोकांच्या कलेने घेतल्याखेरीज निभाव लागणार नाही हे त्याला ठावूक होते. त्याने नागरशा दुसरा याचा पुत्र

लाहुरशा याला पुन्हा माहीमच्या गादीवर बसवले आणि कारभार हाकावयास सांगितले. हे सर्व अवघ्या वर्षभराच्या कालावधीत झाले. लाहूरशा याने ९ वर्ष माहीम वरून राज्यकारभार पाहिला. पुढे शके १२७९ (इ.स. १३५७) मध्ये मलिकने राज्य नायते राजांच्या हाती दिले. नायते हे शक १११६ पासून सामान्य देसाई होते. पुढे ते मुसलमान झाले आणि मलिकच्या दरबारात बहुदा त्यांनी वजन प्राप्त केले असेल. त्यांच्या कारकिर्दीत इतर देसाई आपापली कामे पाहून होते. कोणीही कुठलाही उठाव करण्याचा प्रयत्न केला नाही. लाहूरशा नंतर त्याच्या घराण्याचा कोणीही इतका बलशाली झाला नाही की तो पुन्हा उठाव करून राज्य हस्तगत करू शकेल. नायते याने मलिकच्या आणि पर्यायाने दिल्लीच्या पातशहाच्या आशीर्वादाने तब्बल ४० वर्षे राज्य केले. पुढे कोणी भोंगळे म्हणून राजे आले त्यांनी २० वर्षे राज्य केले.  जव्हार येथे असणारा वाडा बहुदा ह्यांनीच बांधला. (मला खात्री नाही पण खूप वर्ष आधी गेलो होतो तेंव्हा पाहिल्याचे स्मरते) पुन्हा शके १३५१ मध्ये राज्य अमदाबादचा सुलतान (ह्यांचा नायते राजांशी जवळचा संबंध होता.) ह्याने घेतले. राज्य कोणाचेही असो, सर्वोच्च सत्ता दिल्लीची होती. पुढे अनेक वर्ष (अंदाजे ८०) अमदाबादचा सुलतान ठाणे -साष्टी आणि महिकावती भागावर राज्य करून होते.

नर्मदा ओलांडून अल्लाउद्दिन खिलजी दख्खनेत येणे ही जशी धक्कादायक घटना होती तशीच अजून एक घटना शके १४२२ मध्ये घडली. ती महिकावती प्रांतात घडली नसली तरी पुढच्या २०० वर्षात ह्या घटनेचा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मोठाच परिणाम झाला. ती घटना म्हणजे २ तरावे घेऊन पोर्तुगीझ कोची बंदरात उतरले. आपण सर्वांनी वास्को-द-गामा हा भारतात आलेला पहिला पोर्तुगीझ दर्यावर्दी असल्याचे शाळेत वाचले आहे. पण बखरीत त्याचा उल्लेख येत नाही. कप्तान लोरेस लुईस देत्राव ह्याच्या नेतृत्वाखाली सिनोर देस्कोर आणि बोजीजुझ अशी २ जहाजे कोची बंदरात दाखल झाली होती. वास्को-द-गामा हा बहुदा यात असावा आणि त्याने फक्त नोंदी करून ठेवल्या असाव्यात.




क्रमश: ...
 
 
 

महिकावतीची बखर - भाग ९ : कोकणातील फिरंगाण ...


शके १४२२ (इ.स. १५००) मध्ये पोर्तुगीझांनी कोची बंदर ताब्यात घेतले आणि वखार घालून व्यवसाय करू लागले. जागा बळकट करू लागले. अवघ्या १२ वर्षात तिथून गोवा आणि मग थेट वसई - दमण प्रांतात आले आणि तिथेही व्यापार करू लागले. वसईच्या दांडाळे तळे ह्याठिकाणी तटबंदी उभी करून त्यांनी वस्ती केली. अर्थात हे सर्व प्रांताचा मुसलमान सुभेदार याच्याकडून परवानगी घेऊन अधिकृतरित्या चाले. आवश्यक तेंव्हा पोर्तुगीझाचा वकील दिल्ली दरबारी हजेरी लावी. नंतर नंतर डच, ब्रिटीश, फ्रेंच जसजसे भारतात येऊ लागले तसे पोर्तुगीझाचे वकील हे कायम स्वरूपी दिल्ली-आग्रा येथे राहू लागले. सुरवातीला त्यांच्या हजेरीत आणि वजनामुळे इतर युरोपीय सत्तांना दिल्लीवरून सवलती मिळवून घेणे कठीण पडत होते.

पुढे तर गोव्यावरून आरमार आणून

कप्तान आलमेद याने लष्करीदृष्ट्या वसई ते दमण हा भाग ताब्यात घेतला. थोडक्यात महिकावती प्रांतावर पोर्तुगीझ या नव्या राज्यकर्त्यांचे आगमन झाले होते. प्रांतातील देसायांना त्याने काही विशेष फरक सुरवातीला पडण्याचे कारण नव्हते. कारण मुसलमान राजे तसेच फिरंगी. धर्म-कर्म आणि व्यापार उदीम याला पोर्तुगीझांनी सुरवातीला कसलेच बंधन घातले नाही. जवळ-जवळ २५ वर्षे इथे बस्तान पक्के बसवल्यानंतर पोर्तुगीझांनी धर्मछ्ळ सुरू केला. अनेकांना बाटवले आणि जे तयार झाले नाहीत  त्यांना कैद करून गोव्याला पाठवले. आजही वसई प्रांतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरित झालेले हिंदू आहेत. त्यांची आडनावे हिंदू असली तरी ते ख्रिस्त धर्माचे पालन करतात. ह्यात बहुसंख्य लोकांचे पूर्वज हे शेष, सूर्य आणि सोमवंशीय क्षत्रिय आहेत जे बिंब, यादव आणि नागरशाच्या काळात सुखाने नांदत होते. अजून एक म्हणजे वसई आणि आसपासच्या भागात जसे ख्रिस्त मोठ्या प्रमाणावर आढळतात तसे ते वैतरणा नदीच्या पलीकडे म्हणजे सफाळे, केळवे - माहीम उर्फ महिकावती आणि पुढे डहाणू - बोर्डी येथे आढळत नाहीत. ह्याचे कारण काय असावे?

बिंबदेव यादव याचा पुत्र प्रतापशां यादव महिकावती भागावर राज्य करत होता हे आपण मागे पाहिले आहेच. प्रतापशांची एक स्त्री होती जिच्या

देवशा नावाच्या पुत्राला प्रतापशांने काही गावांचे हक्क दिलेले होते. ह्या देवशाचा पुत्र रामशा याने शके १२९४ (इ.स. १५७२) मध्ये वाडा-जव्हार आणि आसपासच्या भागातील १५७ गावे जिंकून राम नगर स्थापिले होते. आज ठाणे जिल्ह्यातील जे रामनगर आपण ऐकतो ते हेच. त्या प्रांतावर रामशा उर्फ यादवांचे वंशज राज्य करीत होते. ह्या प्रांतावर पोर्तुगीझांची नजर गेली आणि त्यांनी रामनगर ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यावेळी तेथे कोणी कोळी उमराव होता त्याची मदत पोर्तुगीझांनी घेतली आणि त्याला चौथाई देऊन रामनगर सोबत तह केला. पोर्तुगीझांच्या जोरावर कोळी माजला आणि त्याने स्वतंत्र कारभार सुरू केला.

महिकावतीची बखर मधील प्रकरणे १ आणि ४ (जी खरेतर सर्वात शेवटी लिहिले गेली - पाहा भाग १) ही ह्याच काळात लिहिली गेली. भगवान दत्त नामक लेखकाने पूर्वीची टिपणे वापरून बखरीत नव्याने माहिती जोडली आणि ती भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिली.

पुढे पोर्तुगीझांनी

वसई ते डहाणू अशी २७ सागरी किल्ल्यांची साखळी उभी केली. हे किल्ले लहान असले, काही तर नुसते बुरुज सदृश्य असले तरी टेहाळणीच्या दृष्टीने मोक्याचे होते. दुसरीकडे अशेरी-अडसूळ, तांदूळवाडी, कोहोज, टकमकगड, काळदुर्ग हे डोंगरी किल्ले मजबूत करून पोर्तुगीझ वसई प्रांतात कायमचे बसले तें बसले. अखेर शके १६६१ (इ.स. १७३९) मध्ये चिमाजी आप्पा यांच्या वसई मोहिमेने तें तिथून हुसकावले गेले.

२०० वर्ष पोर्तुगीझांनी दमण ते वसई आणि चौल - रेवदंडा भागात निर्विवाद राज्य केले. आजही त्यांचे अस्तित्व तेथे स्पष्टपणे जाणवते आणि खुपसे खुपते...


इथे बखरीचा ऐहासिक घटनाक्रम संपतोय मात्र पुढील भागापासून बखरीच्या अनुषंगाने इतर काही ऐतिहासिक समकालीन बाबींवर उजेड पाडण्याचा प्रयत्न करुया.

क्रमश: ...

 

महिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...


बखरीमध्ये जो ऐतिहासिक कालखंड दर्शवलेला आहे त्यावर आपण गेल्या १० भागांमध्ये नजर टाकली. वि.का.राजवाडे यांनी बखरीला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये आद्य महाराष्ट्रीक नेमके कोण होते ह्याबद्दल काही विश्लेषण केलेले आहे. आता ते जरा बघुया.

पुरातन काळी महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग, कोळी (कोल), ठाकर, दुबळे, घेडे, वारली, मांगेले (मांगेळे), तांडेले हे लोक वस्ती करून राहत होते. नागवंशीय लोक समूहाने कोकणात वस्त्या करत होते. आर्यादी भाषा बोलणारे जे लोक उत्तरेकडून आले त्यांचा नागांशी झालेल्या शरीर संबंधातून आजचे जे 'मराठे' ते उदयास आले.

महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर दुबळे आणि घेडे या जाती आहेत. ह्या दोन्ही जाती गुजराती बोलतात आणि शेती करून जगतात. भाषेवरून ते उत्तरेकडून आल्याची सहज अनुमान काढता येते. मुख्य व्यवसाय शेती असल्याने ह्या जाती समुद्राकडे कधी सरकल्या नाहीत आणि वर रानात देखील चढल्या नाहीत. ह्याच समकाळात वारली हा सह्याद्रीच्या जंगलात आपले स्थान राखून होता. वारली हे उत्तम मराठी बोलतात आणि ते सूर्य उपासक आहेत. इतर जातींच्या मनाने वारली हा बराच प्रगत होता असे दिसते. पण तो नेमका कुठून आला हे निश्चित सांगता येत नाही. तो बहुदा उत्तरेकडून म्हणजे सध्याच्या विंध्योत्तर भागातून आला असावा असा कयास राजवाडे यांनी मांडलेला आहे. समुद्रापासून साधारण १५ मैल अंतरावर असलेल्या रानात त्याचे वास्तव्य होते.

समकाळात मांगेले हे मुळचे आंध्रप्रदेशातून आलेले लोक समुद्र किनारी वसले. गोदावरीच्या सुपीक खोऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्राकडे वाटचाल केली आणि येताना ते स्वतःचा मासेमारीचा धंदा येथे घेऊन आले. समुद्राशी निगडीत उपजीविका असल्याने त्यांनी समुद्र किनाऱ्यापासून अर्धामैल पर्यंतच्या टापूत वस्ती केली आणि आजही ते तेवढाच टापू बाळगून आहेत. समुद्र सोडून ते कधी डोंगराकडे सरकले नाहीत. आजही उत्तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर मांगेले मासेमारीचा धंदा करतात.

वारली जेंव्हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वस्त्या करून राहू लागला तेंव्हा तेथे खूप आधीपासून कातकरी (कातवडी), ठाकर आणि डोंगरकोळी लोकांच्या वस्त्या होत्या. कातकरी हा सर्वात जुना. कातकरी हा शब्द कृतीपट्टीन ह्या शब्दावरून आला असावा असे अनुमान राजवाडे मांडतात. कृती म्हणजे कातडे आणि पट्ट म्हणजे वस्त्र. हे लोक मुळचे रानटी असून त्यावेळी प्राण्यांचे कातडे पांघरून राहायचे म्हणून त्यांना हे नाव पडले असावे. कातकरी जेंव्हा जंगलात राहत होते तेंव्हा त्याहीपेक्षा निबिड अशा डोंगर कपाऱ्यात गुहाशय राहत होते. कातकरी किमान कात तरी पांघरी मात्र गुहाशयाला ती कला देखील अवगत नव्हती. ह्या दोघांत कातकरी टिकला. गुहाशयामागून रानात नाग, ठाकर, कोळी आणि मग वारली आले.

ठाकर हे वारल्यांच्या आधीपासून सह्याद्रीची राने राखून होते आणि त्यांचे अस्तित्व फक्त उत्तर भागात नाही तर सर्वत्र पसरलेले होते. ठाकर लोकांच्या थोडे खालच्या रानात कोळी लोकांची वस्ती होती. ह्यांच्या मधलेच समुद्र कोळी हे मासेमारी वर जगत आणि समुद्र किनारयाने राहत. कोळी जातीचे मूळ वंशज कोल हे होते.
कातकरी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचे रूप कसे असेल ह्याबद्दल आता पत्ता लागण्याचा जरा सुद्धा संभाव राहिलेला नाही. मांगेल्यांचे आणि वारली लोकांचे तेच. राजवाडे यांनी ह्याबद्दल बराच खेद व्यक केला आहे. परंतु त्यांनी बरीच मेहनत घेऊन अंदाजे स्थळ-काल दर्शवणारा एक तक्ता तयार केला आहे. तो असा...

अतिप्राचीन लोक - गुहाशय, कातकरी (कातवडी), नाग : शकपूर्व २००० च्या पूर्वी (अंदाजे शकपूर्व ५०००)

मध्यप्राचीन लोक- ठाकर, कोळी, वारली : शक पूर्व २००० ते १०००

प्राचीन लोक -
दामनीय, महाराष्ट्रिक : शकपूर्व ९०० ते ३००

पाणिनिकालीन लोक -
मांगेले, सातवाहन, नल, मौर्य : शकपूर्व ३०० ते शकोत्तर २००

जुने मराठे -
चौलुक्य, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकुट : शकोत्तर ३०० ते ११०० 

जुने मराठे - बिंब, यादव : शकोत्तर ११०० ते १२७०

मुसलमानी राज्य - मलिक, अमदाबादचे सुलतान : शकोत्तर १२७० ते १४६०

युरोपियन - पोर्तुगीझ :शकोत्तर १४२२ ते १६६०

अर्वाचीन मराठे - भोसले : १६६० ते १७२५

युरोपियन - इंग्रज : शकोत्तर १७२५ ते १८६९

ह्या नोंदी घेताना त्यांनी 'इसवी सन'चा वापर न करता 'शक' वापरला आहे.

अपेक्षा आहे की येथे मांडल्या गेलेल्या अल्प माहितीमुळे आपल्या ज्ञानात काहीतरी भर निश्चित पडली असेल... पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक विषय घेऊन...
........................................ समाप्त .......................................

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रविवार, २३ जुलै, २०२३

मांसाहारी वनस्पति

https://www.maayboli.com/node/23693

 पृथ्वीवर वनस्पति प्राण्यांच्या आधी निर्माण झाल्या. इथे प्राणी हा शब्द मी वनस्पति सोडून बाकी सर्व सजीव, अशा व्यापक अर्थाने वापरतोय. पण नंतर निर्माण झालेले प्राणी, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या अन्नासाठी वनस्पतिंवरच अवलंबून आहेत. भले ते मांसाहारी का असेनात, ते ज्या अन्नसाखळीचा हिस्सा आहे, त्या साखळीचे एक टोक, वनस्पति हेच असते.

निसर्गात अशी देवाणघेवाण एकतर्फी नसते. प्राण्यांची उत्सर्जिते, वनस्पतिंना अन्न पुरवतात हे खरे आहे, पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

वनस्पतिंना जगण्यासाठी हवा, पाणी, प्रकाश आणि काही मूलद्रव्ये लागतात. हवेशिवाय तर कुठलाच सजीव जगू शकणार नाही, पण बाकिच्या घटकांपैकी एकाचा अभाव असल्यास, आपल्यात काहि महत्वाचे बदल घडवून आणून, वनस्पतिंनी परिस्थितीवर मात केलेली आहे.

अशा काही खास वनस्पतिंची ओळख पुढच्या काही लेखातून करुन घेऊ.

मूलद्रव्यांचा अभाव असल्याने काही वनस्पति चक्क मांसाहारी बनल्या आहेत. पुर्वी "विचित्र विश्व" असे एक छोटेखानी मासिक येत असे. त्यामधे चौकटीत अशी काहि सदरे असत, जसे " आफ्रिकेमधील जंगलात काहि नरभक्षक वनस्पति आढळल्यात. कुठलाही प्राणी त्यांच्याजवळ गेल्यास त्यांची पाने सळसळू लागतात. तो प्राणी आणखी जवळ गेल्यास आपल्या फांद्यांच्या विळख्यात .... "
नाही मी असले काही लिहिणार नाही.

उंच डोंगर, तीव्र उतार, दलदल अशा ठिकाणी तिथल्या खास परिस्थितीमूळे झाडांना आवश्यक असलेल्या मूलद्रव्यांचा अभाव असतो. अशा ठिकाणी अनेकवेळा भरपूर पाऊस पडतो. या पावसामूळे जमिनीची प्रचंड प्रमाणात धूप होते. मातीचा वरचा सुपीक थर निर्माण होऊ शकत नाही, आणि जी काही मूलद्रव्ये उपलब्ध असतात, ती वाहून जातात.
पावसाळी ढगांमूळे सूर्यप्रकाशाचा अभाव असतो. अपूर्‍या सूर्यप्रकाशामूळे तपमान कमी असते. वनस्पतिंना पालापाचोळा कूजल्यामूळे जे विघटन होते, त्यापासूनही मूलद्रव्ये मिळतात, पण या ठिकाणी तपमान कमी असल्याने, हि प्रक्रिया खूपच विलंबाने होते.

अशा ठिकाणी मार्श पीचर नावाची वनस्पति तग धरु शकते, कारण या परिस्थितीवर मात करण्यासाठी एक अनोखा उपाय तिने शोधलेला आहे.

या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Heliamphora असे आहे. मराठीत याला काही नाव आहे का याची कल्पना नाही. खरं तर वरच्या फोटोत दिसणार्‍या वनस्पति थोड्या वेगळ्या आहेत, मूळ वनस्पति केवळ हिरवट पिवळ्या रंगाच्या असतात. तर जरा आणखी जवळून बघू या.

यातला जो उभा भाग आहे ते पानाचेच रुप आहे. एरवी पाणी शोषणे हे पानाचे काम नसते. उलट पाणी वापरणे हेच पानाचे काम असते. पानाला जे पाणी लागते ते पान स्वतः शोषू शकत नाही. पानावर पडलेले पाणीही ते शोषू शकत नाही. खरे तर पानावर पाणी साचले तर पान गुदमरते. त्यातली रंध्रे मोकळी रहात नाहीत व सूर्यप्रकाश मिळवण्यातही अडचण येते, म्हणून बहुतांशी पाने टोकेरी असतात व त्यावर पन्हळी असतात, जेणेकरुन त्यावर पडलेले पाणी वाहून जावे.

पण हे पान मात्र त्याला अपवाद आहे. याचे साधारण फूटभर उंचीच्या पानाची, चण्याच्या पूडीसारखी गुंडाळी केलेली असते. आणि त्यात पावसाचे पाणी साठवले जाते.
एवढ्या उंचीच्या नरसाळ्यात जर पाणी साठवले तर त्या वजनाने हि रचना कोसळू शकते. म्हणून हा पेला काठोकाठ न भरता, वर थोडी जागा सोडली जाते. ही जागा राहण्यासाठी या पुडीची गुंडाळी वरच्या बाजूने थोडी सैल असते, तिथून जास्तीच्या पाण्याचा निचरा होतो. काही जातीत तर ठराविक उंचीवर छिद्रेच असतात, ज्यातून जास्तीचे पाणी बाहेर पडते.

आता जरा आणखी जवळून या पानांची रचना बघू.

या पानाची वरची रचना खास असते. या पानाच्या वरच्या भागातून किंचीत साखरपाण्याची निर्मिती होते. त्याला भूलून काही माशा आणि डास भूलून या पानावर येतात. त्यांना अपेक्षित असते तेवढे साखरपाणी काहि तिथे नसते. आणखी खाद्याच्या शोधात ते याच्या आत जातात.
आतमधे थोडा चिकट आणि केसाळ भाग असतो. हे केस खालच्या दिशेने वळलेले असतात. त्यावरून तो किटक खाली घसरतो, आणि तसाही या रचनेमूळे त्याला परत वर चढणे अशक्यच असते.
आणि ते किटक पाण्यात पडतात. आजूबाजूला आधाराला काहीच नसल्याने यथावकाश ते पाण्यात बुडतात.
मूळ मार्श पीचर वनस्पति यानंतरचे काम पाण्यातील बॅक्टेरियांकडून करुन घेतात. त्या बॅक्टेरियांनी त्या किटकाची विल्हेवाट लावली कि मूक्त झालेली मूलद्रव्ये हे पान शोषून घेते.

वरच्या फोटोत दिसताहेत ते आहेत ट्रंपेट पीचर. यात असे चमकदार रंग असतात. वरच्या फोटोतली रंगसंगती मांसाच्या रंगाशी मिळतीजूळती असल्याने काही खास किटक आकर्षित केले जाऊ शकतात. दूसरे म्हणजे यातील पाणी हे साधे पाणी नसून खास पाचक रसांनी युक्त असते. त्यात पडलेले किटकांचे देह कुठल्याही बॅक्टेरियांच्या मदतीशिवाय विघटीत केले जातात.

आता या झाडाच्या या खास योजनेचा फायदा काही छोटे बेडूक घेतात. ते यांच्या काठावर बसतात आणि आकर्षित झालेले किटक गट्टम करतात. पण हा खेळ त्यांच्या अंगाशी येऊ शकतो, कारण ते जर का या सापळ्यात पडले, तर त्यांनाही बाहेर पडणे शक्यच नसते आणि आतले जहाल रसायन त्यांचा खातमा करते. बेडूक असून बुडाला, असे काहिसे होते खरे.

या झाडांची चापलुसी बघा. परागीभवनासाठी यांना किटकांचीच मदत घ्यावी लागते. त्यासाठी फूलांची रचना, अगदी वेगळी केली जाते.

या फूलात कुठलाही खोलगट भाग नाही. यातही साखरपाणी असतेच. शिवाय ही फूले स्वतंत्र देठावर येतात आणि पानांपेक्षा उंचही असतात.
कीटक तसे शहाणे असतात. जर त्यांना कळले कि या पानातले अमिष फसवे आणि जीवघेणे आहे, तर ते या पानांच्या वाटेला जाणारच नाहीत. पण त्यांच्या पहिला अनुभव हाच शेवटचा ठरतो. आणि शहाणपणा पुढच्या पिढीत पोहोचवायला ते जिवंतच रहात नाहीत.

आपण वरची जी झाडे बघितली ती व्हेनेझुएला, दक्षिण अमेरिका भागातली होती. याचाच एक प्रकार दक्षिण पूर्व आशियात आढळतो, आणि त्याचे नाव घटपर्णी. (आपल्याला फक्त हे नावच माहित असते, आपण क्वचितच ही वनस्पति बघितलेली असते. )

(सिंगापूर विमातळावरच्या टर्मिनल ३ वर मी हे बघितले होते. पण फोटो काढायचा राहिला होता. योगायोगाने वर्षूच्या एका लेखात मला हे फोटो दिसले. मागणी केल्यावर तिने ते तत्परतेने दिलेच शिवाय मला हवी असलेली जादा माहिती पण कळवली. त्याबद्दल तिचे आभार मानायचा उपचार मी पाळणार नाही. )

वर्षूला चिनी नववर्षाच्या बाजारात या वनस्पति दिसल्या होत्या.

आणखी जरा जवळून बघू या.

या वनस्पति मुद्दाम जोपासलेल्या आहेत. निसर्गात यांची वाढ होते त्यावेळी पानचे टोक, एखाद्या तणाव्याप्रमाने वाढत जाते, योग्य तो आधार सापडला, कि त्याभोवती एक विळखा घालून हा घट निर्माण केला जातो.
या घटाचे अनेक आकार असू शकतात. यात अर्थातच एक द्रव भरलेला असतो. एका जातीत (हो त्याचे नाव राजा असे आहे ) तर लिटरभर द्रव असू शकतो.
या घटांना आतून किंचीत मेणचट पापुद्रा असतो. हा पापुद्रा सुटून त्या भक्षाच्या पायाना चिकटतो, आणि त्याचे सुटकेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात.

त्या द्रवात पडलेल्या प्राण्याच्या धडपडिने या झाडाच्या ग्रंथी उद्दीपीत होतात आणि जास्तीत जास्त तीव्र रसायने त्या द्रवात सोडली जातात. निव्वळ छोटे किटकच नव्हेत तर झुरळे, विचू आणि उंदिरही स्वाहा केले जातात.

आता असे झाड, चिनी लोक तरी शुभ मानत असतील का अशी मला शंका आली होती. आणि वर्षूने कळवल्याप्रमाणे, हे झाड काही तिथे शुभ मानले जात नाही. तसेच पारंपारीक रित्या काही ते नववर्षाचे प्रतीकही नाही, केवळ शोभेचे म्हणून तिथे ते होते.

वरच्या लिखाणावरुन असा समज होऊ शकतो, कि किटकांना सुटकेचा काही उपाय नाही. पण निसर्गात बदल हे नेहमीच घडत असतात. काही किटकांच्या अळ्यांनी या झाडाच्या जहाल पाचक रसांपासून स्वतःचे रक्षण करणारी यंत्रणा, अंगी बाणवली आहे. त्या अळ्या या पाण्यात राहून त्यात पडलेल्या किटकांवर ताव मारतात. पण त्या अळ्यांच्या उत्सर्जनाने त्या झाडाचा फायदा होतो.

काहि जातीत तर मुंग्यांसाठी एक वेगळा कप्पा असतो. पण इथेही दोन्ही पार्टींचा फायदा आहेच. मुंग्या मोठ्या किटकांचा फडशा पाडतात. त्यापैकी काही भाग त्या खातात तर उरलेला झाडासाठी सोडतात. मुंग्यांना पण भक्ष मिळते आणि झाडाला त्या किटकांचे पचवायला सोपे असे छोटे भाग करुन मिळतात.

यापेक्षा आणखी काही वनस्पति किटकभक्षी असतात. त्यापैकी एक आपल्याकडे (कासच्या पठारावर ) दिसू शकते. तिचे मराठी नाव दवबिंदू (सनड्यू ) नावाप्रमाणेच तिच्यावर दवविंदू असतात पण ते फसवे असतात. त्यावर बसलेल्या किटकांना सापळ्यात अडकवणारा तो चिकट द्रव असतो.

व्हीनस फ्लायट्रॅप म्हणून एक वनस्पति असते. ती आपल्याकडे सापडते का याची कल्पना नाही. यात तर चक्क सापळाच असतो, आणि मोठा किटक त्यावर बसला, कि त्याची दोन दले, मिटतात. अगदी छोटा किटक असेल तर त्याच्या काटेरी सापळ्यातून सुटू शकतो, पण मोठा किटक मात्र सुटू शकत नाही. वरच्या दोन्ही वनस्पतिंचे माझ्याकडे, मी काढलेले फोटो नाहीत. म्हणून इथे देता येत नाहीत.

आणखी अशा काही अनोख्या वनस्पतीची पुढे ओळख करुन घेऊच.

तुम्ही सांगितलेल्या व्हीनस फ्लाय्ट्रॅप चे व्हीडिओ ..

http://www.youtube.com/watch?v=iy4BWrYSPyM&feature=rec-LGOUT-exp_fresh+d...

http://www.youtube.com/watch?v=_DZiTACprhE

आपल्या इथे सह्याद्रीच्या कड्या कपार्‍यांमधून पावसाळ्यात एक इन्सेक्टिव्होरस प्रकार दिसतो - ब्लॅडर वोर्ट अथवा अर्टिक्युलेरिया नावाचं हे झाड - अगदी बारीक, नाजूक जांभळी पांढरी फुलं असतात मुगाच्या डाळी एवढी., त्याच्या मुळांवर मोहरीच्या दाण्याएवढे बारके बारके नॉड्यूल्स सारखे असतात. कड्यावरून वाहणार्‍या पाण्यातले बारिक कीटक , अळ्या यात अडकतात अन झाड त्यातील प्रोटीन शोषून घेते. इतकं बारीक अन नाजूक झाड कीटकभक्षी असेल असं वाटत सुद्धा नाही.

मी घेउन सुकवलेलं सॅम्पल घरी अजून असेल तर फोटो टाकायला सांगीन .

मी तेच विचारणार होतो, इथल्या भटक्यांना. कि त्याचे फोटो मिळताहेत का ते.
Utricularia amenthystina असे नाव आहे. मला कधी दिसली नाही डोंगरात. हमखास दिसेल असे एखादे ठिकाण आहे का ?

अशाच मांसाहारी वनस्पती कासच्या पठारावर आढळतात. ड्रॉसेराचा फोटो ललिता-प्रितीकडे पाहिला होता.
आहेत ती "सीतेची आसवं". नाव जरी करूण असलं तरी हि फुलं पक्की बदमाष आहेत. Happy वाहत्या पाण्याबरोबर येणार्‍या किटकांचे शोषण करणारी. Happy

ज्या जमिनीत क्षारांची कमतरता आहे, खास करुन नायट्रोजनची, त्या जमिनीत
या वनस्पती वाढतात. यांच्या काठावर एखादा किटक बसला, कि त्याला आकर्षण
वाटेल असे गोड पाणी आतल्या बाजूस काठावर असते. तिकडे तो सरकला, कि आतल्या द्रवात तो पडतो. आतल्या भित्ती गुळगुळीत असल्याने त्याला बाहेर पडणे
अशक्य असते. त्यातल्या द्रवातच तो बुडतो. मग त्या द्रवातील पाचक द्रव्ये त्या
किटकाचे विघटन करतात. आणि त्याचा केवळ सांगाडा राहतो.
या वनस्पती तशा लबाडही असतात. कारण त्यांची फुले या सापळ्यांपेक्षा वेगळ्या
पातळीवर असतात. (फोटोत दिसताहेत) आणि परागीवहनांसाठी त्यांना याच किटकांची मदत होते.
कातळावर, जिथे सुपीक मातीचे थर तयर होऊ शकत नाहीत किंवा दलदलीत जिथे
पाण्यातील क्षार, वनस्पतींना शोषता येत नाहीत, तिथे या वनस्पती वाढतात.
आपल्याकडे कास पठारावर आणि व्हेनेझुएला मधल्या रोरायमा पर्वतावर अशी परिस्थिती आहे. (माझा एक सविस्तर लेख होता, यावर.)


बुधवार, १९ जुलै, २०२३

मुंबईचा पहिला शेअर घोटाळेबाज

 

BSE आणि राजाबाई टॉवर वसवणारा 'प्रेमचंद रायचंद' होता मुंबईचा पहिला शेअर घोटाळेबाज!!


मंडळी, शेअरबाजार घोटाळा म्हटलं की बहुतेकांना पहिलं नाव आठवतं हर्षद मेहताचं!! सर्व सामान्य माणसांपर्यंत शेअर बाजार पोहचला तो हर्षद मेहेतामुळेच. त्याआधी हा बाजार काही मोजक्या सामाजिक वर्तुळापुरताच मर्यादित होता. जी काही अफरातफर व्हायची ती या वर्तुळाच्या परिघाच्या आतच व्हायची. हर्षद मेहताने हा परिघ राष्ट्रीय पातळीवर नेला आणि त्यामुळे घोटाळा म्हटलं की त्याचंच नाव पहिल्यांदा आठवतं. पण मंडळी, आज आम्ही तुम्हाला तब्बल दिडशे वर्षं जुनी अशी मुंबई शेअर बाजाराच्या एका 'आद्य 'घोटाळेबाजाची कथा सांगणार आहोत. "इतकी जुनी कथा ऐकण्यात काय मजा आहे आहे?" असं तुम्ही म्हणालही. पण गंमत अशी आहे की १८६२ च्या दरम्यानच्या त्या घोटाळ्यात आणि हर्षद मेहताच्या १९९२ घोटाळ्यात काहीही फरक नाही. फक्त इसवी सनाचे आकडे बदललेले दिसतील, नावं वेगळी दिसतील, बाकी ज्याला 'मोडस ऑपरेंडी' म्हणजे गुन्हा करण्याची पध्दत म्हणतात, ती आहे तशीच आहे. चला तर, आता वाचू या मुंबई शेअर बाजाराच्या आद्य घोटाळेबाज प्रेमचंद रायचंदच्या 'बॅकबे रेक्लेमेशन ' फ्रॉडबद्दल!!

(प्रेमचंद रायचंद)
या कथेला सुरुवात करण्यापूर्वी काही थोडी माहिती शेअरबाजाराबद्दल जाणून घ्या. या बाजारात नफा नुकसान ज्या पद्धतीने होते त्याला ' झिरो सम गेम असे म्हणतात. याचा अर्थ असा की एकाने गमावल्याखेरीज दुसर्‍याचा फायदा होत नाही. थोडक्यात नफा आणि नुकसान यांची बेरीज केली तर उत्तर शून्यच येईल. दुसरे असे की, प्रत्येक अफरातफरीत कमीतकमी एका बँकेचा तरी बळी जातोच. हर्षद मेहतामुळे कराड बँक गेली, केतन पारेखमुळे माधवपुरा बँक आणि ग्लोबल ट्रस्ट या दोन बँका बुडल्या, तर ज्या प्रेमचंद रायचंदबद्दल आपण वाचणार आहोत, त्यांच्यामुळे बाँबे बँक बुडली. आता वळू या मुख्य कथेकडे !
प्रेमचंद रायचंद हा रायचंद दिपचंद या श्रीमंत व्यापार्‍याचा मुलगा होता. त्याची आणखी ओळख म्हणजे बाँबे स्टॉक एक्सचेंज म्हणजे ज्याला तेव्हा नेटीव्ह स्टॉक एक्सचेंज म्हणायचे त्याच्या स्थापनेत हातभार लावला आणि आपल्या आईचं- राजाबाईचं नांव मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला दिलं जावं म्हणून एकूण ५,५०,००० खर्चापैकी २ लाख रुपयांची भरभक्कम देणगी दिली. जात्याच हुषार असलेल्या या मुलाने जर इंग्रजी शिक्षण घेतले तर व्यापारात फायदा होईल या विचाराने वडिलांनी त्याला एल्फिन्स्टन महाविद्यालयात घातले. अपेक्षेप्रमाणे प्रेमचंद रायचंद हा मुंबई शेअर बाजारातला अस्खलित इंग्रजीतून व्यवहार करणारा पहिला स्टॉकब्रोकर झाला. काही दिवसांतच एक नंबरचा "बुलियन ट्रेडर" (सोने चांदीचा व्यापारी) आणि कमोडीटी ट्रेडर (त्यावेळी मुख्यतः कापूस आणि अफू) असे नाव पण त्याने कमावले. आता या सगळ्याचा मूळ कथेशी काय संबंध आहे ते बघू या!!

हा कालखंड साधारण १८६२ ते १८६६ चा होता. या काळात ब्रिटिशांना भारतातून कापूस आणि चीनमधून चहा मोठ्या प्रमाणात लागायचा. चीनला त्या मोबदल्यात अफू आणि चांदी हवी असायची. मँचेस्टरच्या कापडगिरण्यांसाठी ब्रिटनला कापूस हवा असायचा. पण या व्यवहारात ब्रिटनमधली चांदी संपुष्टात यायला लागली. साहजिकच भारतात चांदीचे भाव भडकले. अमेरिकन यादवीमुळे कापसाचे भाव भडकले. या दोन्हीत तेजी आल्यावर त्यात सट्टा सुरु झाला. हा सट्टा प्रेमचंद रायचंदच्या हातात होता. दुसरी गोष्ट अशी की त्यावेळी सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार हुंडीवर चालायचे. प्रेमचंद रायचंदच्या पेढीची हुंडी म्हणजे शंभर ट्क्के विश्वासार्ह, अशी ख्याती असल्याने कोणताही व्यवहार प्रेमचंद रायचंदच्या मध्यस्थीशिवाय पार पाडायचा नाही. थोडक्यात, मार्केट कोणतेही असो, त्या मार्केटच्या नाड्या किंवा सूत्रे एकाच माणसाच्या म्हणजे प्रेमचंद रायचंदच्या हातातच असायची!! अतिशय हुशार, धूर्त आणि दानशूर अशा या माणसाला त्याच्या कॉटन मार्केटच्या आणि शेअर बाजारातील यशस्वी सट्टय़ांमुळे मुंबईचा सगळ्यात मोठा सटोडिया हा किताब मिळाला होता. या प्रेमचंद रायचंद माणसाची खासियत अशीही होती की त्यांने घेतलेले शेअर्स त्याच्या नावावर कधीच नसायचे. मुनीम, मेहता, कारकून यांच्या नावावर तो सगळी गुंतवणूक करत असे.

असा धूर्त, हुशार आणि कावेबाज माणूस नेहेमी एखाद्या 'वन्स इन लाइफ टाइम 'मोक्याच्या शोधात असतो आणि संधी प्रेमचंद रायचंदच्या आयुष्यात अब्राहम लिंकनमुळे आली!! १८६० साली अब्राहम लिंकनने अमेरिकेतली गुलामगिरीला संपवली आणि अमेरिकेत यादवी सुरु झाली. मँचेस्टरला येणारा कापूस बंद पडला. भारतीय कापसाला प्रचंड मागणी आली. न्यूयॉर्कच्या कापसाच्या भावावर सट्टा सुरु झाला. भारतात तर न्यूयॉर्क कॉटनवर आकडा लावण्याची साथच आली. लोक त्यांच्याकडे आहे नाही ते सगळं काही विकून सट्टा खेळायला लागले. खेळीया अर्थातच एकच होता- तो म्हणजे प्रेमचंद रायचंद!! या सट्ट्यात प्रेमचंद रायचंदने इतके पैसे कमावले की त्याने चक्क एक बँकच विकत घेतली. त्या बँकेचं नाव होतं बाँबे बँक. एकदा बँक हातात आल्यावर त्याला आकाश मो़कळे झाले आणि जन्माला आली बॅकबे रेक्लेमेशन कंपनी!

तर, त्याकाळात मुंबईत कापसाच्या सट्टय़ात लोकांनी लाखो रुपये कमवायला सुरुवात केली होती. तेव्हाच मुंबईत नव्या कंपन्यांचे पेव फुटले. त्या एका वर्षामध्ये एकूण सत्तेचाळीस कंपन्यांची नोंदणी झाली. बँका तेव्हा शेअरमध्ये पैसे गुंतवण्यास कर्ज द्यायच्या नाहीत. प्रेमचंद रायचंदनी आपल्या वडिलांकडून पैसे घेऊन या बाँबे बँकेला कर्ज दिले आणि हळूहळू बँक ताब्यात घेतली. यानंतर इतर बँकांनीही शेअर्समध्ये सट्टा करण्यासाठी कर्ज द्यायला सुरुवात केली. सोबत स्वत:साठीही प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले. पेपरमधली जाहिरात पूर्ण न वाचताच शेकडो अर्ज कंपन्यांकडे पैशांसकट येऊन पडायचे. शेअर्सची अलॉटमेंट होण्याआधीच त्यात सौदे लिहायला सुरुवात व्हायची. त्यावरचे प्रीमियम जाहीर व्हायला लागले. सगळ्या कंपन्यांना एकच दलाल हवा असायचा- प्रेमचंद रायचंद. बऱ्याच वेळा कंपन्या सटोडियाला पैशाऐवजी आणखी शेअर्स द्यायच्या. सटोडियाचं आणखी फावायचं. 

(कॉटन बाजार)
या सगळ्या नवीन उदयाला येणाऱ्या कंपन्यांत अशीच एक नवी कंपनी आली. बॉम्बे लँड रेक्लेमेशन कंपनी. या कंपनीला बॅकबे कंपनी म्हणून पण ओळखलं जायचं. आता जिथे नरिमन पॉइंट आहे, ती सगळी जमीन भराव टाकून ताब्यात घेण्याचं काम ही कंपनी करणार होती. त्याच वेळी भायखळा माझगाव परिसरात आणखी एक कंपनी आली. माझगावच्या बाजूला असलेला समुद्र हटवून जमीन तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवून ही कंपनी तयार झाली होती. प्रेमचंद रायचंद यांच्या हुशारीचा एक किस्सा सांगितल्याशिवाय ही कथा पुढे सांगणं कठीण आहे. माझगावच्या डेव्हलपिंग राइट्सची किंमत साधारण पाच लाख गृहित धरली गेली होती. प्रेमचंद रायचंदनी हे राइट्स चाळीस लाख रुपये देऊन सकाळी विकत घेतले आणि संध्याकाळी साठ लाखाला विकून टाकले. सहा तासांत वीस लाख रुपये, तेही १८६४ सालचे वीस लाख रुपये या माणसाने कमावले होते. 
तारतम्याचा अंत झाला की तेजी संपुष्टात येते..

(प्रेमचंद रायचंदचा बंगला)
हळूहळू मुंबईला तेजीच्या ज्वरांनी पछाडलं. जे शेठ करेल, तेच मुनीम करायला लागला, मुनीम करेल तेच मेहता म्हणजे अकाऊंटंट करेल, मेहता करेल ते कारकून कारकून करेल ते ड्रायव्हर आणि माळी. मुंबई शेअर बाजार तापून लाल झाला. आधी बॅकबे कंपनीचे चारशे शेअर्स सरकार घेणार होते, पण तो इरादा ऐनवेळी सरकारने बदलला. मग त्या चारशे शेअर्सचा लिलाव करण्यात आला आणि मग दोन लाख रुपयांचे शेअर्स दहा कोटी पाच लाखाच्या बोलीस विकले गेले.
आणि एक दिवस अमेरिकेतलं युद्ध संपलं. कापसाच्या व्यापाराला मंदीचं ग्रहण लागलं. सटोडिये पैसे चुकवायला टाळाटाळ करायला लागले. दिवाळखोरीची लाट आली. शेअर बाजार तीन दिवस बंद ठेवला गेला. पण पैशाची तरतूद होईना. एकामागोमाग कंपन्या बंद पडायला लागल्या. बॅकबे कंपनीसकट सगळ्या कंपन्यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली. एकेक करून सगळे ब्रोकर दिवाळखोर झाले. आपले कथानायक प्रेमचंद रायचंद यांची सगळी मालमत्ता विकल्यावर एकूण देण्याच्या फक्त दीड टक्के रक्कम वसूल झाली. अशा तऱ्हेने बाँबे बँकही बुडाली.

(बँक ऑफ बॉम्बे)
वाचकांना एक विनंती... प्रेमचंद रायचंद यांच्या वर लिहिलेल्या कथेत फक्त हर्षद मेहता हे नाव टाका, कथा तशीच्या तशीच आहे. केतन पारेखचं नाव टाकून बघा, कथा तशीच आहे. तशीच तेजी! तसंच वारं डोक्यात जाणं! तसाच अंत!! फरक एवढाच की, हर्षद मेहता आणि केतन पारेख यांनी फ्रॉड करताना एक पायरी पुढे जाऊन खोटी कागदपत्र वापरली. या सटोडियांमध्ये साम्य असं की त्यांना आपण कुणीतरी महान झाल्याचा साक्षात्कार झाला होता. प्रेमचंद रायचंदने बांधलेला मुंबईचा राजाबाई टॉवर आजही याची साक्ष देतो आहे.
हे फ्रॉडस् कसे आणि का घडतात?

(हर्षद मेहता, प्रेमचंद रायचंद आणि केतन पारेख)
तर, छोटे छोटे गुंतवणूकदार असेच अल्पकाळाची स्मरणशक्ती असलेले असतात. एक फ्रॉड संपला की दुसरा घडेपर्यंत सगळेजण सगळं काही विसरलेले असतात. याआधीचे सगळे घोटाळे झाले तेव्हा आपण ग्लोबल नव्हतो. आपल्या अर्थव्यवस्थेच्या समस्या आपल्या खाजगी होत्या. आता ग्लोबल झाल्यावर जागतिक समस्या पण आपल्याच समस्या आहेत किंवा आपल्या समस्या जागतिक आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे प्रॉब्लेम आपले आहेत.

मिलिंद आरोलकर --

कराचीला जुळी मुंबई का म्हटले जात असे.

 https://milindjournalist.blogspot.com/search?updated-max=2021-05-09T20:24:00-07:00&max-results=7&start=21&by-date=false


कराचीला “जुळी मुंबई” म्हटलं जायचं, ती मराठी माणसाची होती हे तुम्हाला माहिती आहे का? मग वाचा हा लेख…

कराचीला “जुळी मुंबई” म्हणलं जायचं

ब्रिटिशांच्या काळात १९३६ साल पर्यंत कराची हे मुंबई प्रांतात होतं. मुंबईचा गव्हर्नरची सत्ता थेट कराची पर्यंत चालायची.
कराचीला “जुळी मुंबई” म्हणून ओळखलं जायचं. तशी एकार्थी लोक वस्ती हिंदू बहुसंख्य होती. मराठी कुटुंब तर अनेक होती.
आजही मुंबईत अनेक कुटुंबे आपले आजोबा-पणजोबा कराचीला सरकारी नोकरीत होते, फाळणीच्या वेळी आपले वडील कराचीहून आले असं सांगणारे आढळतात.
काही कराचीकरांनी तर मुंबईत एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था ही बांधल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील मळगाव गावचे एक नाईक कुटुंब पिढ्यानपिढ्या कराचीला स्थायिक झाले आहे.
त्यापैकी कराचीच्या एका हॉटेलात कर्मचारी असलेल्या नाईकांची मुलाखत काही वर्षांपूर्वी वाचनात आली होती.

सिंध प्रांताची फाळणी

सुमारे १९३६ साली सिंध प्रांत हा मुंबई इलाखा पासून वेगळा करण्यात आला एका अर्थी तेव्हाच फाळणीची बीजं रोवली गेली होती. लोकसंख्येचे गुणोत्तर यानंतर वेगाने बदलत गेले.
आपल्याच कुटुंबात, जातीत, जमातीत, व्यापारात, धनदौलतीत रमलेल्या हिंदू समाजाला आपल्या इस्टेटी बाहेर सिंध प्रांतात मुस्लिम बहुसंख्य कधी झाले हे कळतच नाही.
त्यामुळे फाळणीच्या वेळी सगळ्यात कमी संघर्ष सिंध प्रांतात झाला,
नेसत्या वस्त्रानिशी  भारतात पलायन करण्यावाचून हिंदू समाजाला पर्यायच नव्हता कारण लोकसंख्येच्या अनुपाता प्रमाणे हिंदू समाजात संघर्षाचं त्राणच उरलं नव्हतं. असो.
पाकिस्तानातल्या सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शहा यांनी दोन-अडीच वर्षांपूर्वी कराचीतल्या आपल्या शाळेला भेट दिली.
शाळेच्या जुन्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला. शाळेचे नाव आहे NJV हायस्कूल.

NJV… आद्याक्षरांवरून आपल्याला शाळेच्या नावाचा पूर्ण उलगडा होत नाही.

NJV म्हणजे नारायण जगन्नाथ वैद्य. शाळेचे पूर्ण नाव घ्यायला
गेलं तर ते आहे नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल.

आश्चर्याचा धक्का बसला ना?

नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूलचा इतिहास

ही शाळा सिंध प्रांतातील पहिली सरकारी शाळा आहे. १८५५ साली ६८ मुलांना घेऊन हि सिंधी माध्यमातली शाळा सरकारतर्फे सुरू करण्यात आली होती.

त्यावेळी नारायण जगन्नाथ वैद्य हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील उच्चविद्याविभूषित गृहस्थ सिंधचे शिक्षण उपनिरीक्षक होते.

पुढे १८७६ साली शाळेचे स्थलांतर करण्यात आले व नारायण जगन्नाथ वैद्य यांचे नाव या शाळेला देण्यात आले.

१९१६ साली शाळेत ४७७ विद्यार्थी शिकत होते पैकी फक्त १२ विद्यार्थी मुसलमान होते. शिवाय पारशी व यहुदी विद्यार्थीही शाळेत शिक्षण घेत होते.

१९३३ साली कराची महानगर पालिकेचे पहिले महापौर, पारशी समाजाचे जमशेदजी मेहता हे याच शाळेचे विद्यार्थी होते.

सिंध विधानसभेचे अधिवेशन भरण्याचा मानही या शाळेच्या वास्तूला मिळालेला आहे.

कराचीच्या शाळेत हिंदू मुख्याध्यापक


१९१० साली २५० विद्यार्थी शिकत असलेल्या या हायस्कूलला राज्य सरकार कडून ४०२० रुपयाचे अनुदान मिळत होते.

उच्चविद्याविभूषित व शिक्षण तज्ञ असलेल्या नारायण जगन्नाथ वैद्य यांनी सिंध भागात शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचे नाव या शाळेला देण्यात आले.

शाळेच्या सुरुवातीच्या काळात सातत्याने मराठी भाषिक मुख्याध्यापक तर १९४० पर्यंत हिंदू मुख्याध्यापक शाळेला लाभले होते.

मात्र त्यानंतर सामाजिक परिस्थिती बदलली ती आजतागायत.

हजारो विद्यार्थ्यांना आज शिक्षण देणारी ही शाळा पाकिस्तानच्या मानबिंदू पैकी एक आहे.

या शाळेची इमारत जागतिक वारसा अर्थात हेरीटेज वास्तूंच्या यादीत समाविष्ट केलेली आहे.

मुंबईतील सोन्याचांदीचे प्रथितयश व्यापारी पोपली यांच्यापासून चंदू पंजाबी हलवाई कराचीवाला यांच्यापर्यंत लक्षावधींच्या संख्येने फाळणीच्या वेळी सिंधी बांधव हिंदुस्थानात मुसलमानांच्या अत्याचारामुळे स्थलांतरित झाले.

फाळणीच्या जखमा काळाने भरल्या गेल्या परंतु व्रण मात्र कायम आहेत.

सिंध प्रांतातल्या शैक्षणिक क्षेत्रावर आपला अमीट ठसा उमटवणारे शिक्षण तज्ञ जगन्नाथ नारायण वैद्य यांचे कर्तृत्व मात्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला काहीही करून मिटवता आले नाही

मिलिंद आरोलकर --

10 एप्रिल राष्ट्रीय भूमापन दिन

 भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले?

त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने 33 गुणिले 33 अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला 1 गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पध्दत पुरातन काळापासुन आहे. भारतामध्ये इ.स. पुर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पध्दत होती. भारतात जमिनीचे सर्व्हेक्षण व नकाशे तयार करणेची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रम्हांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकाळाची नियोजनबध्द संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसुन येते. शंखापासुन बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवणेसाठी “रज्जूक” नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्यांच्या काळात संस्कृतमधील “रज्जू” यावरून “रज्जूक” हा शब्द प्रचलित झाला. कौटील्याच्या म्हणजेच आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी,प्रतवारी, सर्व्हेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.1540 ते 1545 दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळी- चा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी 1/3 हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील 19 वर्षाच्या सरासरी इतके पुढील 10 वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे.
मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन 1605 ते 1726 या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसुल आकारणीशी निगडीत होते. याव्दारे जमिनीची मालकी व महसुल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन 1674 पासून जमिन महसुल आकारणीसाठी “खेडे” हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन व करणा-यांची क्षमता पाहुन कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पध्दतीला "*कमालधारा*" म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे यांचे मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत.दुसर्‍या बाजीरावाच्या काळात ही पध्दत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला.18 व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भिमा नदीपासुन तापी नदीकाठच्या बहरानपुर विस्तृत भुप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा,अजंठा टेकड्या,महत्वाची गावे व नद्या सांकेतिक पध्दतीने दाखविल्या आहेत. याच दरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे. ब्रिटीशांनी सन 1757 पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविण्याकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटीशांनी सन 1767 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत ‘”Bengals Atlas” या पुस्तकात शंकु साखळीने जमिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वताचे पासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमीतीय भूमापनाचे अधीक्षक होते. 1830 मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. जॉर्ज एव्हरेस्ट यांना ‘सर्व्हेअर जनरल बहादूर’ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला व पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी 33 वर्षात पूर्ण केले. अशा प्रकारे भारतीय भूखंडाचे मोजणी काम एकुण 37 वर्षात पूर्ण झाले.सन 1818 मध्ये जेव्हा ब्रिटीशांनी मराठयांकडून सत्ता काबीज केली त्यावेळी दक्षिण विभागाचे राजकारणी कमिशन माउन्टस्टूअर्ट एलन्फिस्टन यांनी रयतवारी पध्दतीचा पाया घातला. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुध्द पध्दतीने गुंटर नांवाच्या अधिका-यांने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत सदर साखळी 33 फुट लांबीची असून 16 भागात विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला.
40 गुंठयाच्या जमिनीच्या क्षेत्राला एक एकर म्हणत. जमिन महसूल ठरविण्याचा पहिला मान पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन 1827 मध्ये मिळविला. सध्या अस्तिवात असलेली जमिन महसूल आकारण्याची पध्दत ब्रिटीश राजवटीत ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार आहे.सध्या महाराष्ट्राच्या महसूल विभागांतर्गत येणारा भूमी अभिलेख विभाग महसूल विभागाचा पाया आहे. जमिनीच्या मालकीचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीची पुनर्मोजणी अत्यंत महत्त्वाची आहे. संगणकीकरणाच्या जमान्यात या विभागांतर्गत नियमित कामाव्यतिरिक्त
ई-मोजणी, ई-फेरफार,
ई-चावडी,ई-अभिलेख,
ई-अभिलेख, ई-नकाशा,
ई-पुनर्मोजणी, ई-नोंदणी, ई-भूलेख इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव योजना राबविण्यात येतात.


मिलिंद आरोलकर -

पिक्चर मुंबईच्या रस्त्यावरचा....!

 https://milindjournalist.blogspot.com/search?updated-max=2021-05-30T01:39:00-07:00&max-results=7&start=14&by-date=false


पिक्चर  मुंबईच्या रस्त्यावरचा....!



 काही दिवसांपूर्वी पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील जुने छायाचित्र मिळाले , आणि मन जवळ जवळ ४०-४५ वर्ष मागे भूतकाळात गेले.असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला.साले काय दिवस होते. . माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख 
आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव हा रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी मुंबईत रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. .मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे.आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या.मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असायची मग चांगला सिनेमा असेल तिथे जायचे तो संपला की दुसरीकडे जायचे तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा.गणपतीमधे १० दिवस रोज सिनेमा असायचा.
सिनेमा बघताना मधेच पाऊस यायचा मग आडोशाला पळायचे.प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरायचे.त्याकाळी गणपतीत फार कमी पाऊस असायचा एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे. 
आम्ही कुठे कुठे जायचो कसेही कुठेही बसायचे रस्त्यावर बसायचे गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून अगदीच काही मिळाले नाही तर वर्तमानपत्र किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो.त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही.घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.

प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे खूप मजेशीर गोष्ट असायची.गंमत म्हणजे पडद्याच्या एका बाजूला लहान मोठ्या मुली व बायका बसायच्या तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि आपण लहान मोठी तरुण मुल पुरुष ,तर नेहमी विरुद्ध बाजूला त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसली असे वाटायचे, सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची.हे सगळे नको असेल तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभे राहून बघायचं नाहीतर कडेला रेतीवर खडीवर बसून बघावे लागायचे ती खडी टोचायची.जेवढे लांब बसू तेवढा सिनेमा छोटा दिसायचा म्हणून पुढे बसायचे.सिनेमा बघताना भरपूर डास चावायचे मुंग्या चावायच्या तरीसुद्धा नेटाने प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवायचे त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायचे त्यांना टेबल फॅन असायचा.त्यांचा खूप हेवा वाटायचा.

 त्यावेळी.सिनेमा चालू असताना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे मग बोंबाबोंब.मधेच उंदीर किंवा घूस यायची नाहीतर कुत्रे घुसायचे मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या माऱ्यामाऱ्या व्हायच्या.आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करताना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे इंग्रजी मध्ये स्क्रीनवर यायचे तेव्हा नंबर ओरडायचो.एक रीळ संपले की दुसरे लावायचे.. काहीवेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र सिंक्रो नाही झाले तर विचित्र वाटायचे ऍक्शन आधी आणि आवाज नंतर तरी बघायचो.  

सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या मग परत रिवाइंड करून वन्स मोअर.इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे तेवढे वेळा रिवाइंड.पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत सोड सोड म्हणून ओरडत.

केश्तो असितसेन , मेहमूद , असरानी , जगदीप राजेंद्रनाथ , यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची.गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे.शम्मी, देव, ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेशखन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची.सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे.शोले, जंजीर दिवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम,तिसरी मंझिल.वो कौन थी, कालिचरण किती नावे घेऊ हे सिनेमे थिएटर आणि रस्त्यावर असंख्य वेळा बघितले.

  मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे दामुअण्णा शरद तळवलकर , राजा गोसावी ,निळू फुले., सूर्यकांत रमेश देव , अशोक सराफ , दादा कोंडके , रवींद्र महाजनी ,सीमा , चित्रा , रेखा , जयश्री गडकर , रंजना ,उमा यांचे पिक्चर असायचे.सासुरवाशीण सिनेमा बघताना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या.त्यावेळी ते दोघ तिथे आले असते तर त्यांनी नक्की मार खाल्ला असता अशी परिस्थिती असायची.
 १९८२ साली भारतात एशियाड खेळाचे आयोजन करण्यात आले होते. भारतात पहिल्यांदा रंगीत टि.व्ही चा जमाना सुरु झाला . त्यावेळी सघन घरातल्यांकडे 'कलर टी.व्ही असायचा सोबत व्ही.सी.आर प्लेअर वा व्ही.सी.पी प्लेअरवर रंगीत सिनेमे कँसेट आणून पाहिले जात . पण सामान्यासाठी रस्त्यावरच्या पिच्करची क्रेज काही कमी झाली नाही . हे सगळ १९९० सालापर्यत सुरु होते पुढे केबल टी.व्हीचा जमाना आला व सगळच इतिहासजमा झाल. .
आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात.कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.
गेले ते दिन गेले
 
रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही.आणि खिशातून पांच पैशाचे चणे दाणे खाण्याची चव फ़्रेंच फ्राईज बर्गर आणि पॉपकॉर्नला येणार नाही.आताच्या मुलांना ही मजा अनुभवाला कधीच मिळणार नाही.


मिलिंद आरोलकर -