गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

श्रीराम FAQ

 https://kalaapushpa.com/2021/01/21/srirama-faq/

सिंड्रेलाची गोष्ट ऐकून कोणी असे विचारात नाही की बुवा सिंड्रेलाने मुळात अन्याय सोसलाच का? किंवा “युरोप मधील समाज बालकामगारांना राबवून घेणारा होता.” किंवा “सिंड्रेलाने कुणाची मदत का घेतली नाही?” किंवा “ती सावत्रआई काही वाईट नव्हती! नवरा मेल्यावर सुद्धा तिने सिंड्रेलाचा सांभाळ केला न? तिला हाकलून तर दिले नाही न घरातून? मारहाण तर नाही न केली तिला? विद्रूप तर नाही न केलं तिला? मग? चांगलीच होती ती!” हे प्रश्न विचारले जात नाहीत कारण ती गोष्ट आहे हे मानले असते वाचकाने.

पण रामायणाच्या बाबतीत तसे नाही. रामायणाबद्दल व त्यामधील पात्रांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्याचा अर्थच असा की रामायण ही ‘कथा’ म्हणून प्रश्नकर्त्याने वाचली नाही. प्रश्नकर्ता मान्य करतो की रामायण घडले आहे, राम हा एक मानव होता आणि कधी काळी तो अस्तित्वात होता.

याच प्रश्नाकार्त्यांच्या  काही प्रश्नांची उत्तरे आणि (गैर)समजांचे निराकरण.

काय सांगता?! उत्तर रामायण वाल्मिकींनी लिहिले नव्हते? ते मागाहून लिहिले गेले होते? कशावरून?

अभ्यासकांचे या बाबतीत एकमत आहे, रामरायाच्या राज्याभिषेकाने समाप्त होणारे वाल्मिकींचे रामायण सुखांत होते. उत्तर कांड किंवा उत्तर रामायण हे मागाहून कुणीतरी लिहिले. या निष्कर्षाप्रत पोचण्याचे करणे पुढील प्रमाणे आहेत –

  1. वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीला नारदमुनींनी वाल्मिकींना सांगितलेली रामाची कथा आली आहे. ही संक्षिप्त कथा रामराज्याभिषेकाने संपते. वाल्मिकींना तेवढीच कथा माहित होती. नारदांच्या कथेत ना सीतेच्या त्यागाचा उल्लेख येतो, ना लव-कुशाच्या जन्माचा, ना लव-कुशाने  रामायण गाण्याचा.
    1. वाल्मिकी रामायणातील युद्ध कांडाच्या शेवटच्या सर्गात वाल्मिकी लिहितात – रावणाचा वध केल्यावर राम-लक्ष्मण-सीता अयोध्येला परत आले. त्यावेळी भरत त्यांचे स्वागत करायला नंदीग्राम येथे आला. आणि त्याने तिथेच रामाला राज्याभिषेक करवला. राज्याभिषेक झाल्यानंतर रामाने अनेक वर्ष उत्तम राज्य केले आणि सगळे आनंदात, सुखात राहिले.” त्यानंतर रामायण ऐकल्याने काय फळ मिळते ते सांगितले आहे. अर्थात इथे फलश्रुती आली आहे. सुग्रास पोटभर जेवण झाल्यावर तांबुल खावा तसे रसपूर्ण कथा ऐकून त्याची फलश्रुती ऐकावी. तांबुल खाल्यावर कोणी पुन्हा वरण भाताने परत जेवायला सुरुवात करत नाही, तसे फलश्रुतीने वाल्मिकी रामायण संपते.
  2. उत्तरकांड या शब्दाचा अर्थच – नंतरचे कांड. मग हे वाल्मिकींनीच नंतर लिहिले नाही कशावरून? वाल्मिकींना जर उत्तरकांड लिहायचे असते तर तसे असते तर त्यांनी युद्ध कांडला फलश्रुती लिहिली नसती. त्या अर्थी दुसऱ्या कोणीतरी उत्तर कांड नंतरहून लिहिले असणार.  
  3. सीतेला सोडवल्यावर, सीतेच्या अग्निपरिक्षेनंतर रामाने अग्नीला वचन दिले आहे –  
    • विशुद्धा त्रिषु लोकेषु मैथिली जनकात्मजा |
    • न विहातुं मया शक्या कीर्तिरात्मवता यथा || ६-११८-२० ||
    • तिन्ही लोकात अत्यंत शुद्ध असलेली जनकात्मजा मैथिलीला मी कधीही अंतर देणार नाही! जसे मनुष्य आपली कीर्ती आपल्यापासून दूर करू शकत नाही, तशी सीता नित्य मजसोबत असेल!
    • ज्या इक्ष्वाकू घराण्यातील दशरथाने आपले वचन पाळण्यासाठी प्राण दिले, रामाने वडिलांच्या वचनासाठी वनवास पत्करला, भरताने दिलेल्या शब्दासाठी आयते मिळालेले राज्य परत केले, रामाने सुग्रीवाला त्याचे राज्य व पत्नी मिळवून दिली … तो राम अग्नीला दिलेले वचन विसरून उत्तरकांडात सीतेचा त्याग कसा करेल?
  4. युद्धकांड, सर्ग १२८ मध्ये सांगितले आहे – रामाने नंतर ‘शताश्वमेध’, शंभर अश्वमेध यज्ञ केले. हे यज्ञ त्याने सीतेसोबतच केले. सीतेचा सोन्याचा पुतळा ठेवून नाही केले. कोणताही यज्ञ करतांना यजमान पत्नीला विशिष्ठ कर्तव्य असत. तिने पुतळ्या सारखं बसून हाताला हात लावून ‘मम’ म्हणणे इतकचं काम नसते. त्यामुळे रामाने सीतेचा त्याग केल्यावर शेजारी सीतेची सोन्याची मूर्ती ठेवून यज्ञ केला हे अशक्य आहे.
  5. वाल्मिकींनी त्यांच्या महाकाव्यासाठी ३ नावे सुचवली आहेत – रामायण (रामाचा प्रवास), सीताचरित (सीतेचे चरित्र) किंवा पौलत्स्यवध (रावणाचा वध). वाल्मिकी रामायण युद्धकांड मध्ये रामाच्या प्रवासाने, सीतेच्या (अपहरणाच्या) कथेने आणि रावणाच्या वधाने संपते. यानंतर जर उत्तरकांड पहिले तर त्यामध्ये वेगळीच कथा आहे. जिचे नाव – रामाचा प्रवास, सीतेची (अपहरणाची) कथा किंवा रावणाचा वध या नावांना अनुसरून नाही.
  6. रामायणाच्या नंतर शेकडो वर्षांनी महाभारत घडले. महाभारताच्या वनपर्वातील रामोपाख्यान मध्ये रामाची कथा आली आहे. मार्कण्डेय ऋषींनी युधिष्ठिराचे मनोबल वाढवण्यासाठी रामाची कथा ऐकवली. ती कथा सुद्धा रामराज्याभिषेकाने संपते. म्हणजे निदान महाभारत काळापर्यंत रामायणात सीता त्यागाची कथा प्रचलित नव्हती. अभ्यासकांच्या मते महाभारताच्या नंतर उत्तरकांडची रचना झाली असावी.

वरील आणि इतरही अनेक कारणांमुळे या बाबतीत एकमत आहे कि उत्तरकांड वाल्मिकींनी लिहिलेले नसून, ते मूळ रामायणात नव्हते.

शुर्पणखा दंडकारण्याची स्वामिनी असतांना रामाने तिच्या अरण्यात जाऊन राक्षसांशी वैर का घ्यावं?

“स्वामिनी” म्हणजे काय? “स्वामी”चे कर्तव्य काय? कुणाला राजा म्हणायचे? याचे उत्तर वाल्मिकी रामायणातच मिळते. चित्रकुटमध्ये भेटायला आलेल्या भरताला राम विचारतो – “भरता! राज्यातील जनतेचे रक्षण करणे हा राजधर्म आहे. तू तो धर्म पळत आहेस न? तू प्रजेचे रक्षण करत आहेस न? राज्यातील स्त्रियांना संरक्षण देत आहेस न? तुझ्या राज्यातील कृषी करणारे, पशुपालन करणारे, वेदाभ्यास करणारे यांचे रक्षण करत आहेस न? अयोध्येतील प्राण्यांचे आणि चौरस्त्यावरील वृक्षांचे सुद्धा रक्षण तू करत आहेस न?”

‘स्वामिनी’ म्हणून हीच कर्तव्य ओघाने शुर्पणखेकडे येतात. पण, दंडकारण्यात वास करणाऱ्या ऋषींनी रामाला विनंती केली की येथील नरभक्षक राक्षसांपासून आमचे संरक्षण कर. शूर्पणखा तेथील ‘स्वामिनी’ असून सुद्धा त्या ऋषीमुनींना रामाकडे का धाव घ्यावी लागली? शूर्पणखा त्यांचे रक्षण करत नव्हती हे उघड आहे! तसेच त्या ऋषींना तिच्या पासूनच भय होते हे देखील उघड आहे.

ऋषींचे अर्थात सज्जनांचे, अबलांचे रक्षण करण्यासाठी रामाला दंडकारण्यातील राक्षसांशी वैर घ्यावे लागले.  

शुर्पणखेला रामाने व लक्ष्मणाने नकार का दिला?

शूर्पणखा सुंदर स्त्रीचे रूप घेऊन आली व तिने रामाला लग्नासाठी मागणी घातली. मात्र रामाने एकपत्नीव्रत असल्याचे कारण सांगून शुर्पणखेला नकार दिला. नको असलेल्या मागणीला नकार देण्याचा अधिकार फक्त स्त्रीला असतो का? पुरुषाला नकार देण्याचा अधिकार नाही का? स्त्री-पुरुष समानता मानणारे निश्चित रामाचा नकाराधिकार मनातील.

शुर्पणखेने साधी लग्नाची मागणी घातली होती, तर लक्ष्मणाने तिचे नाक  का कापले?

शूर्पणखा क्षणात रामावर तर क्षणात लक्ष्मणावर भाळली होती. तिचे काही रामावर उदात्त प्रेम वगैरे नव्हते. तिला दोघांपैकी कोणीपण नवरा म्हणून चालणार होता. रामाने आणि लक्ष्मणाने तिला नकार दिला, पण ती तो पचवू शकली नाही. तेंव्हा ती नरभक्षक राक्षसी रामाला म्हणाली – “मी या लक्ष्मणाला खाऊन टाकते. तुझ्या बायकोला पण माझ्या तीक्ष्ण नखांनी फाडून तुझ्या देखत आताच्या आत्ता खाऊन टाकते. मग तू आणि मी या दोघांच्या कटकटीतुन मुक्त होऊन आनंदाने या अरण्यात राहू!” असे म्हणत ती सीतेच्या अंगावर धावून गेली. म्हणून लक्ष्मणाने तिचे नाक कापले.

अगदी अलीकडच्या काळापर्यंत नाक कापणे ही एक सर्वसाधारण शिक्षा होती. उदाहरणच घ्यायचे तर, १८व्या शतकातील टिपू सुलतानने कित्येक सैनिकांचे नाक कापल्याचा उल्लेख इंग्रजांनी केला आहे. ‘एखाद्याचे नाक कापणे’ / ‘नाक कटवा देना’ असे वाक्प्रचार भारतीय भाषांमध्ये अजूनही दिसतात. तस्मात्, शूर्पणखेचे नाक कापणे ही त्या काळातील एक सामान्य शिक्षा होती. 

रावणाने सीतेला पळवले ते शुर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी.

रामाने लग्नाला नकार दिल्यावर शूर्पणखेने आपले बंधू खर व दूषण यांना सैन्य घेऊन त्यांच्यावर हल्ला करायला पाठवले. पण रामाने त्यांना हरवले. मग तिने आपली तक्रार रावणाला सांगितली. पण रावणाला काही तिचे नाक कापल्याचा सूड घ्यावा असे वाटत नाही. तेंव्हा तीने रावणाला सांगितले –“अरे, त्या रामाची बायको फार सुंदर आहे. तुझ्यासारख्या बलाढ्य राजाला ती राणी म्हणून शोभेल. जा तिला बळजबरीने पळवून आण. आणि तिची इच्छा असो नसो, तिच्याशी लग्न कर.”

रावणाने सोन्याची लंका उभारली, त्याच्याकडे पुष्पकविमान होते. तो महान राजा होता.

लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान हे दोन्ही रावणाने आपल्या भावाकडून ओरबाडून घेतले होते. स्वत: रावण मोठ्या प्रौढीने सीतेला सांगतो –

मत् भय आर्तः परित्यज्य स्वम् अधिष्ठानम् ऋद्धिमत् |
कैलासम् पर्वत श्रेष्ठम् अध्यास्ते नर वाहनः ||

वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग ४८

मी माझ्या मोठ्या भावाला कुबेराला, सळो की पळो करून सोडले. त्याच्या कडून लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान बळकावले. मला घाबरून तो कैलासात पळून गेला. असे पराक्रम करणारा मी शक्तिशाली दशानन आहे!

लक्षमणाने उर्मिलेला आपल्या सोबत अरण्यात का नेले नाही?

सीता हट्टाने रामाच्या मागोमाग वनवासात गेली. तिला या निर्णयापासून रामाने परावृत्त केले, तरीही ती तिच्या मर्जीने वनवासात गेली. उर्मिलेने तसे केले नाही. तिने जर स्वेच्छेने वनवासातील त्रासापेक्षा राजगृहातील सुख तिने निवडले असेल तर? सीतेप्रमाणे तिला देखील वनवास निवडण्याचे स्वातंत्र्य होते, पण तिने स्वत:हून सुखाने राजवाड्यात राहण्याचे ऑप्शन निवडले. लक्ष्मणाने सुद्धा तिला जबरदस्तीने अरण्यात नेले नाही. मग तिला का बरे जबरदस्ती १२ वर्ष वनवासात पाठवावे?

उर्मिला दुर्लक्षित राहिली, उपेक्षित राहिली. तिचा उल्लेख का येत नाही?

रामायण ही – रामाच्या प्रवासाची, सीतेच्या चरित्राची व रावणाच्या वधाची कथा आहे. या महत्वाच्या घटनांभोवतीचे तपशील वाल्मिकींनी दिले आहेत. या १४ वर्षांच्या काळात भरत, शत्रुघ्न, सुमंत, वशिष्ठ, विश्वामित्र, जनक, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती, कैकेयी, कौसल्या इत्यादींच्या बद्दल कोणतेच तपशील दिले नाहीत. परंतु जटायू, संपाती, नल, नील, जांबुवंत आदींच्या लहानसहान गोष्टींचा उल्लेख रामायणात आला आहे. कारण त्यांचा वनवासी राम-लक्ष्मण व सीतेशी संबध आला होता. उर्मिला किंवा वरील इतर कोणाचा वनवासातील घटनांशी संबध आला असता तर त्यांचा सुद्धा तपशील आला असता.

रामायण ही केवळ रामाची कथा आहे. सीतेची कथा नाही.

रामायणातील बालकांडात वाल्मिकी म्हणतात – मी लिहित असलेल्या काव्याचे नाव – रामायण (रामाचा प्रवास) किंवा सीताचरीत्र (सीतेचे चरित्र) किंवा पौलत्स्यवध (रावण वध) आहे.

काव्यं रामायणं कृत्स्न्नं सीतायाश्चरितं महत् |
पौलस्त्यवधमित्येवं चकार चरितव्रतः ||

वाल्मिकी रामायण, बालकांड, सर्ग ४

त्यामुळे, रामायण ही कथा जितकी रामाची आहे तितकीच ती सीतेची पण कथा आहे असे वाल्मिकी स्वत: लिहितात.

रावण एक चांगला भाऊ होता. सगळ्या स्त्रियांना रावणासारखा भाऊ हवा असे वाटते.

शूर्पणखा रावणाकडे आपले नाक कापल्याची तक्रार घेऊन गेली तेंव्हा रावणाला काही त्याचा सूड घ्यावा असे वाटले नाही. रावण हा “पर दार अभिमर्शनम्” अर्थात परस्त्रीकडे आकर्षित होणारा, त्यांचा विनयभंग करणारा होता, हे शुर्पणखेला माहित होते. म्हणून तिने आपला पवित्रा बदलून त्याच्याकडे सीतेच्या सौंदर्याचे वर्णन केले. त्यावर रावणाने सीतेला पळवले ते शुर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी नव्हे तर स्वत:च्या मोहासाठी. सीतेला पळवून न्यायला आलेला रावण “शुर्पणखेचे नाक कापले म्हणून मी तुला पळवायला आलो!” असे म्हणाला नाही. तो म्हणाला, “हे सुंदरी! तुझ्यावर माझे मन बसले आहे. माझी लंकानगरी अतिशय सुंदर आहे. तू माझ्यासोबत ये, मी तुला सुखात ठेवीन. इथे रामाबरोबर कुटीत राहून तुला काय मिळणार आहे?

सर्व राक्षस भर्तारम् कामय – कामात् – स्वयम् आगतम् |
न मन्मथ शर आविष्टम् प्रति आख्यातुम् त्वम् अर्हसि ||

वाल्मिकी रामायण, अरण्यकांड, सर्ग ४८

सर्व राक्षसांचा राजा असेलेला मी, मदनाच्या बाणांनी घायाळ होऊन स्वत:हून तुझ्याकडे चालत आलो आहे. माझ्या प्रस्तावाला नकार देऊ नकोस!”

रावणाने सीतेला पळवले पण त्याने तिच्या अंगाला हात सुद्धा लावला नाही. म्हणून तो महान होता!

रावणाने तपस्व्याचा वेश घेऊन सीतेला फसवून घराबाहेर बोलावून घेतले. तसेच आधी तिच्या नवऱ्याला व दिराला युक्तीने दूर पाठवले. अर्थात सीतेला पळवण्याचा त्याचा कट पूर्व नियोजित होता. त्यावर सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध, खांद्यावर उचलून घेऊन आपल्या विमानात बसवून बळजबरीने लंकेला नेले. तिथे तिला अशोकवनात कैदेत ठेवले. तिच्या भोवती दिवसरात्र राक्षसिंचा पहारा ठेवला. आणि तिला धमकी दिली, “एक वर्षाच्या आता माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला मारून टाकेन.”

भारतीय संविधानात स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेणाऱ्याला दंड सांगितला आहे. Section 366 – if a person kidnaps or abducts a woman against her wish so as to marry her, shall be punished with fine and rigorous or simple imprisonment for up to 10 years. Section 368 – Wrongfully concealing or keeping in confinement, kidnapped or abducted person shall be punished in the same way. त्याशिवाय इतरही कलम आहेत.

म्हणजेच एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेल्यास, १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली जाऊ शकते. असा कायदा असलेल्या देशात व त्यामुळे सुरक्षा प्राप्त असलेल्या स्त्रिया जेंव्हा “रावणाने सीतेला फक्त पळवून नेले, तिच्या अंगाला हात लावला नाही.” म्हणत रावणावर स्तुतीसुमने उधळतात, तेंव्हा त्यांची कीव येते.

सीतेच्या अंगाला हात न लावण्याचे कारण वेगळे होते. रावणाने पूर्वी कुबेराकडून त्याचे राज्य, विमान, संपत्ती सगळे लुटले. त्यावर रावणाने कुबेराची पुत्रवधू, म्हणजे आपल्या पुतण्याची, नलकुबेराची बायको नासवली. ते कळल्यावर नलकुबेराने रावणाला शाप दिला – “पुन्हा कुठल्या स्त्रीवर जबरदस्ती केलीस तर तुझा मृत्यू होईल!” आजच्या भाषेत सांगायचे तर नलकुबेराने बायकोवर अत्याचार करणाऱ्या स्वत:च्या काकाला धमकी दिली, “If you rape another woman, I will personally come to Lanka and kill you.”

रावणाने त्याच्या चांगुलपणामुळे नाही तर या धमकीला भिऊन सीतेला स्पर्श केला नाही.

रावण आपल्या प्रजेची काळजी घेणारा एक चांगला राजा होता.

रावणाने स्वत:साठी दुसऱ्याची बायको पळवून आणली. त्यामुळे त्याच्या राज्याचे व त्याच्या प्रजेचे प्रचंड नुकसान झाले. आधी हनुमंताने लंका पेटवून दिली. त्यानंतर रावणाने बऱ्या बोलाने सीतेला परत करायचे सोडून युद्धाचा पर्याय निवडला. हे युद्ध रावणाने स्वत:च्या वासनेपायी प्रजेवर युद्ध लादले.

सीतेची अग्निपरीक्षा

राम आणि सीतेचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते, त्यांचा एकमेकांवर सार्थ विश्वास होता. जसे रामाने सुंदर रूप धारण करून आलेल्या शुर्पणखेचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला, तसेच सीतेने सुद्धा बलाढ्य रावणाचा लग्नाचा प्रस्ताव  नाकारला. अगदी जीवे मारण्याची धमकी दिली, तरीसुद्धा सीता तिच्या निर्नायार ठाम राहिली. राम आणि सीता  एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हते.

असे असून सुद्धा, रामाने सीतेला सोडवून आणल्यावर कोरडेपणाने “तू हवी तिथे जाण्यास मुक्त आहेस” असे सांगितले. हे तिला सांगत असता, रामाची अवस्था कशी होती, त्याबद्दल वाल्मिकी सांगतात –

पश्यतस्तां तु रामस्य समीपे हृदयप्रियाम् |
जनवादभयाद्राज्ञो बभूव हृदयं द्विधा ||

वाल्मिकी रामायण, युद्धकांड, सर्ग ११५

रामाने हृदयप्रिया सीतेला समीप पहिले खरे, पण जनवादाच्या भयाने त्याचे हृदय विदीर्ण झाले.

रामाच्या शब्दांनी घायाळ झालेल्या सीतेने अग्निप्रवेश करायचा ठरवला. तिने लक्ष्मणाला अग्नी प्रदीप्त करण्यास सांगितले. सीतेने रामाला प्रदक्षिणा घातली, अग्नीला प्रदक्षिणा घातली व, “मी कायेने, वाचेने व मानाने केवळ रामाचाच विचार केला असेन तर अग्नीने माझे रक्षण करावे!” अशी प्रार्थना केली. तिथे जमलेले वानर, राक्षस सर्वजण हळहळले व “सीता पवित्र आहे! सीता पवित्र आहे!” असे म्हणू लागले. जनतेनेच असा निर्वाळा दिल्याने लोकापवाद टाळला! या वेळी रामाचे नेत्र अश्रूंनी भरून आले, व तो म्हणाला,

बालिशो बत कामात्म रामो दशरथात्मजः |
इति वक्ष्यति मां लोको जानकीमविशोध्य हि ||

वाल्मिकी रामायण, युद्धकांड, सर्ग ११८

लोकांच्या समक्ष सीता शुद्ध असल्याची ग्वाही मिळणे आवश्यक होते. कारण ही पुष्कळ दिवस लंकेत राहिली होती. हिची शुद्धी न करता जर मी तिचा स्वीकार केला असता तर लोकांनी सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला असता व दशरथपुत्र राम विषयलंपट आहे असे म्हणाले असते. आम्हा दोघांवरचा लोकापवाद टाळण्यासाठी हे दिव्य करणे प्राप्त होते.

सीतात्याग. गर्भवती सीतेला सोडून देणे. 

सीतात्याग प्रसंग उत्तरकांड मध्ये येतो. अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण कांड मागाहून लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायण युद्धकांडातील रामराज्याभिषेकानंतर फलश्रुतीने समाप्त होते. वाल्मिकी रामायणात रामाने सीतेला  अग्नीपरीक्षेनंतर स्वीकारणे योग्य होते. कदाचित नंतरच्या काळातील लोकांनी रामाने सीतेचा स्वीकार कसा काय केला म्हणून आक्षेप घेतला असावा. त्या प्रश्नांना उत्तर म्हणून कुणी उत्तरकांड लिहून त्यात सीतात्याग प्रसंग लिहिला असावा. जो प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही त्याविषयी अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.

तरीही, या विषयावरील माझे मत असे की – उत्तरकांडात राजारामने प्रजेसाठी अत्यंत प्रिय अशा आपल्या पत्नीचा त्याग केला. धृताराष्ट्राप्रमाणे आपल्या पत्नीसाठी, मुलासाठी प्रजेला वेठीस धरणाऱ्या नेत्यांना रामाने घालून दिलेला हा धडा आहे.

रामाला राष्ट्रपुरुष का मानायचे?

सुकुमार रामाला युवराज केले, तेंव्हा तो योगवशिष्ठचा अधिकारी झाला! षोडशवर्षीय रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवले तेंव्हा त्याने त्राटिकेचा वध करून यज्ञाचे रक्षण केले! मिथिला पाहायला नेले तर त्याने शिवधनुष्य तोडून स्वयंवराचा पण जिंकला! वनवासात पाठवले तर तिथे त्याने दुष्टांचे मर्दन करून सुष्टांचे रक्षण केले! भार्या पळवली तर हनुमंतासारख्या दूताकरवी समुद्रापार तिचा शोध घेतला! वनात राहणाऱ्या, वल्कले धारण करणाऱ्या, जटाधारी धनुर्धर रामने सुग्रीवासारखा राजा मित्र म्हणून मिळवला! एकटा दुकटा वनात राहणारा राम सैन्य काय जमवतो, समुद्रावर सेतू काय बांधतो, शत्रूची मर्मस्थळे फोडतो आणि युद्धाला उभा काय राहतो! बलाढ्य अशा लंकाधिपती रावणाला युद्धात हरवतो! वनात राहणारा एक साधा मनुष्य, जो प्रस्थापितांविरुद्ध लढतो, अन्यायाविरुद्ध लढतो आणि युद्ध करून जिंकतो! पुढे रामाला राज्याभिषेक केल्यावर त्याने आदर्श असे रामराज्य निमार्ण केले! असे काम केवळ एक समर्थच करू शकतो.

“How to live a powerful life” – यावर अनेक मॉडर्न गुरु बोलतात. त्या Powerful Life चे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीराम! म्हणूनच – श्रीराम समर्थ आहे. असा समर्थच राष्ट्रपुरुष होण्यास योग्य आहे!

वाल्मिकी रामायणात अगदी सुरुवातीला रामाचे गुण सांगितले आहेत, ते असे – महावीर, पराक्रमी, शत्रूनाशक, यशस्वी, बुद्धिमान, नीतिमान, श्रीमान, स्मृतिमान, प्रतिभानवान, विचक्षण, सज्जन, प्रभावी वक्तृत्व असलेला, ज्ञानसंपन्न, सावध, धर्मज्ञ, वेद व वेदांगांचा तज्ञ, धनुर्वेदाचा तज्ञ सर्वशास्त्रे जाणणारा, प्रजाहितदक्ष, स्वजानांचे रक्षण करणारा आणि सर्वलोकप्रिय असा राजाराम!

समुद्र इव गाम्भीर्ये धैर्येण हिमवानिव ||
विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत्प्रियदर्शनः |
कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवीसमः ||
धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः |

वाल्मिकी रामायण, बालकांड सर्ग १.

श्रीराम हा गांभीर्यात समुद्रा सारखा, धैर्यात हिमालयासारखा आणि शौर्यात विष्णूसारखा आहे! तो दिसायला चंद्रासारखा प्रियदर्शी आहे, क्षमा करण्यात पृथ्वीसारखा आहे, दान करण्यात कुबेरासारखा आहे आणि त्याचा क्रोध कालाग्नीसारखा आहे!  

सीता हनुमंताच्या बरोबर लंकेतून रामाकडे का गेली नाही?

हनुमान सीतेला शोधात लंकेत आला. सीतेला रामाची मुद्रा देऊन, रामाचा निरोप दिला. निघते वेळी हनुमान सीतामाईला म्हणाला, “सीतामाई, तुम्ही जर माझ्या पाठीवर बसलात तर मी तुम्हाला थेट रामाकडे घेऊन जाऊ शकतो. मी पर्वतच काय लंका सुद्धा उचलून घेऊन जाऊ शकतो. तुम्ही निर्धास्तपणे माझ्या सोबत चला. मी तुम्हाला रामाकडे घेऊन गेलो की विरह दु:ख संपून जाईल!”

सीता एक राजकन्या होती. क्षत्रिय होती. तिला युद्धतंत्राची जाण होती. राजकारण कळत होतं. रामाशी राजकारणाविषयी ती चर्चा करत असे. अशी जाणती राणी सीता उत्तरली, “हनुमंता! तू मला रामाकडे समर्थपणे घेऊन जाशील यात शंका नाही. पण, तू मला घेऊन जात असता राक्षस पाहतील आणि ते तुझ्यावर हल्ला करतील. ते संख्येने अधिक आहेत. त्यांनी तुला धरले तर? त्या धडपडीत मी जर तुझ्या पाठीवरून खाली पडले, तर माझा मृत्यू निश्चित आहे. मी जर जिवंत राहिले आणि राक्षसांच्या तावडीत सापडले तर ते मला आणखीन कुठल्या दुर्गम ठिकाणी ठेवतील. तसे झाले तर माझा शोध राम कसा लावेल? किंवा या हल्ल्यात जर चुकून तुझा मृत्यू झाला तर राम जे मला सोडवण्यासाठी योजना आखत आहे ती कशी पूर्ण होईल?

“म्हणून मी सांगते की तू रामाला जाऊन माझा ठावठिकाणा सांग. तो येऊन आपले शौर्य गाजवून, रावणाला हरवून निश्चित माझी येथून सुटका करेल.”

रामाने वालीचा वध कपटाने केला.

भारताने पाकिस्तानला न सांगता रात्रीतून strike केला. हे कपट होते का? किंवा १९६२ मध्ये चीनने भारताला काहीही कल्पना न देता भारतावर हल्ला केला होता, हे कपट होते का? तसेच रामाने शत्रूला न कळत त्याच्यावर वार केला होता. हे अर्थातच वालीला रुचले नाही. त्याने रामाला अशा प्रकारे त्याच्यावर बाण का सोडला हे विचारले. आणि वाल्मिकींना सुद्धा रामाने काय उत्तर दिले हे लिहून ठेवणे महत्वाचे वाटले.

रामाने सुग्रीवाशी मैत्री केली होती. दोघांनी अग्नीला साक्षी ठेवून एकमेकांना त्यांची पत्नी मिळवून देण्यासाठी मदत करायची शपथ घेतली होती. वालीचा वध करून, रामाने सुग्रीवाची पत्नी रुमा त्याला परत मिळवून दिली.

रामाने मृत्यु समीप आलेल्या वालीला म्हटले आहे, “मोठ्या भावाने लहान भावाशी पित्याप्रमाणे वागले पाहिजे. पण तू तर तुझ्या लहान भावाची बायकोच पळवलीस! हा मोठा गुन्हा केलास. या लोकात समाजाविरुद्ध जो वागतो त्याला शिक्षा करणे प्राप्त आहे. मी इथे राजा भरताचा प्रतिनिधी म्हणून तुला शिक्षा करत आहे. गुन्हेगाराचा वध करणे पाप नाही. म्हणूनच तुझा वध करून मी काही गैर केले नाही.” 

रामाने शंबूकाला मारून मागासवर्गीय लोकांवर अन्याय केला?

शंबूक वधाची कथा उत्तरकांड मध्ये आली आहे. अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण कांड मागाहून लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायण युद्धकांडातील रामराज्याभिषेकानंतर फलश्रुतीने समाप्त होते. जो प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही त्याविषयी अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.

तरीही यावरील मत असे – रामाने योगिनी शबरीसाठी “तपोधने, चारुभाषिणी, तापसी” अशी आदरयुक्त विशेषणे वापरली आहेत. तपश्चर्या करणाऱ्या या मातंग ऋषींच्या आश्रमातील या सेविकेबद्दल रामाने नितांत आदर व्यक्त केला आहे. (प्रश्नकर्त्यांच्या मते शबरी ही ‘दलित’ आहे.) किंवा निषादराज गुहा हा रामाचा प्रिय मित्र आहे. (जो प्रश्नकर्त्यांच्या मते ‘अनुसूचित जमातीचा’ आहे.) सुग्रीव, हनुमान, जांबुवंत, जटायू यांची ‘जात’ रामायणाने काढली नाही. (हे सर्व प्रश्नकर्त्यांच्या मते ‘अनुसूचित जमातीचे आहेत.) रामायणातून निश्चितपणे असे दिसते की रामाने जातीचा विचार न करता सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार केला आहे. ‘ब्राह्मण आहे’ म्हणून रावणाला क्षमा नाही, तसेच ‘ब्राह्मण नाही’ म्हणून शबरीला शिक्षा नाही. जातीवरून भेदभाव नाही. गुण कर्मानुसार प्रत्येकाशी व्यवहार केला आहे.

राम ब्राम्हणवादी होता का?

भरत जेंव्हा रामाला भेटायला चित्रकुट येथे आला, तेंव्हा रामाने त्याचाकडे अयोध्येची व राज्यकारभाराची विचारपूस केली. या  संवादात राजाने कसे वागावे, राज्य कसे करावे, राजाची कर्तव्य काय आहेत हे रामाने सविस्तरपणे सांगितले. त्यामध्ये ब्राह्मणांविषयी राम म्हणतो –

 “बंधो! तू असा अचानक वनात का आलास? आपले पिता व माता सुखरूप आहेत ना? मला खात्री आहे की तू आपल्या विनयशील व असूया नसलेल्या पुरोहितांचा सत्कार करत असशील. आपल्या वडिलांच्या वयाच्या निष्णात वैद्यांचा व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांचा तू योग्य मान राखत आहेस ना? ज्यांनी तुला धनुर्विद्या व अर्थशास्त्र शिकवले त्या तुझ्या गुरुजनांशी तू आदराने वागतोस ना? सर्व शिक्षकांचा, वृद्धजनांचा, ऋषी-मुनींचा, अतिथींचा, ब्राह्मणांचा सत्कार करत जा! मात्र धनसंचय करणाऱ्या ब्राह्मणांचा तू सन्मान करू नकोस. काही ब्राह्मण स्वत:ला विद्वान म्हणवून लोकांना अर्थशून्य उपदेश देतात. त्यांचा सत्कार करू नकोस.”

याला ब्राह्मणवादी म्हणायचे का?

रावण हा पुलत्स्य ऋषींचा नातू होता. अगस्त्य ऋषी त्याचे चुलत आजोबा. आणि विश्रवा या योगींचा तो पुत्र होता. अर्थात ब्राह्मण होता. रावणाने परस्त्रीचे अपहरण केले, पण रामाने रावणाला ‘ब्राह्मण’ होता म्हणून क्षमा केली नाही. दान दिले नाही. सत्कार केला नाही. रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला.

याला ब्राह्मणवादी म्हणायचे का?

रामचरित्र कालबाह्य आहे.

“आईं वडिलांचे ऐकावे.”, “भावंडांवर प्रेम करावे.”, “संकट कोसळले असता खचून न जाता त्याचा सामना करावा.”, “आपला प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असला किंवा प्रस्थापित राजा असला तरी सुद्धा त्याच्याशी दोन हात करायला घाबरू नये.”, “राजाने व राणीने प्रजेसाठी स्वत:च्या सुखांचा त्याग करावा.”, “राजा एकपत्नीव्रती असावा.”, “बायकोला शोधण्यासाठी पायपीट करावी लागली, युद्ध पुकारावे लागले तरी बेहेत्तर!”, ही शिकवण जर कालबाह्य झाली असेल तर रामायण कालबाह्य वाटू शकते.

ज्यांना आई-वडीलांना काही विचारू नये, बायको असतांना सुद्धा गर्लफ्रेंड असावी, राजकीय नेत्याने मुलासाठी प्रजेला वेठीस धरले, किंवा रामाराज्य नको, भ्रष्टराज्य हवे असे वाटत असेल त्यांना रामचरित्र कालबाह्य वाटू शकते.

रामाने लक्ष्मणावर अन्याय केला आहे.

रामायण ही रामाची कथा आहे. त्यामुळे त्या मध्ये लक्ष्मणावर फोकस नाही.

रामाचे लक्ष्मणावर जीवापाड प्रेम होते. लक्ष्मण युद्धात जखमी होऊन पडल्यावर, हतबल झालेल्या रामाला शोक अनावर झाला होता. त्रायावेळी म म्हणला, “लक्ष्मण मला माझ्या प्राणांहून अधिक प्रिय आहे. देशोदेशी अनेक पतिव्रता पाहायला मिळतील, पण लक्ष्मणासारखा भाऊ शोधून सुद्धा सापडणार नाही. त्याच्या शिवाय मला विजयश्री नको. आणि पुन्हा अयोध्येला जाणे पण नको. लक्ष्मण जसा माझ्या मागोमाग अरण्यात आला, तसे आता मी त्याच्या मागोमाग यमलोकात जाईन.”  

रामाने शरयू नदीत आत्महत्या का केली?

रामाचा देहत्याग उत्तरकांड मध्ये लिहिला आहे. अभ्यासकांच्या मते, हे संपूर्ण कांड मागाहून लिहिलेले आहे. वाल्मिकी रामायण युद्धकांडातील रामराज्याभिषेकानंतर फलश्रुतीने समाप्त होते. जो प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही त्याविषयी अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही.

परंतु, या विषयावरील माझे मत असे की – “जगावे कसे” हे सांगणारे तत्त्वज्ञान “मरावे कसे” हे देखील सांगते. भारतातील पंथ विविध प्रकारे प्राण कसा सोडावा हे सांगतात. जसे जैन पंथात ‘संथारा’, ‘सल्लेखना’, ‘प्रायोपवेशन’ आदि प्रकार सांगितले आहेत. अशा प्रकारे देहाचा त्याग करण्याला ‘आत्महत्या’ म्हणत नाहीत. आत्महत्या ही जीवनात हरल्यावर इहलोकीची यात्रा संपवण्यासाठी केली असते. तर जीवनकार्य पूर्ण झाल्यावर देहाचा त्याग करणे याला समाधी म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा